एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:45 IST2025-06-03T08:44:43+5:302025-06-03T08:45:29+5:30
ईशान्येकडील राज्यांत पावसाने उडाला हाहाकार

एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ईशान्येकडील राज्यांत पावसाने हाहाकार उडाला असून, अरुणाचल प्रदेशात पूर व भूस्खलनाने मरण पावलेल्यांची संख्या १० झाली आहे. असाममध्ये पुराची स्थिती गंभीर झाली आहे. मणिपूरमध्ये पुरामुळे १९,८११ लोक प्रभावित झाले आहेत व ३,३६५ घरांचे नुकसान झाले आहे.
आसाम : पूरस्थिती गंभीर
गुवाहाटी : आसाममध्ये पुराची स्थिती गंभीर झाली आहे. कछार व श्रीभूमी जिल्ह्यांत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. १५ जिल्ह्यांत सुमारे ५ लाख लोक पुराने प्रभावित झाले आहेत. पूर व भूस्खलनाने मृत्युमुखी पडणारांची संख्या १२ झाली आहे. कछार जिल्ह्यात एक लाखाहून अधिक लोक पुराने प्रभावित झाले आहेत.
अरुणाचल : पूर व भूस्खलनाने लोकांना मोठा फटका
इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यात भूस्खलन व पुराने मरण पावलेल्यांची संख्या १० झाली आहे. सोमवारीही जोरदार पाऊस झाला. राज्यातील २३ जिल्ह्यांतील १५६ गावांत शेकडो लोक पुराने प्रभावित झाले आहेत. लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.
राज्यातील कामेंग, कामले, लोअर व अप्पर सुबनसिगी, पापुम पारे, दिबांग घाटी, लोणर दिबांग घाटी, लोहित, चांगलांग, क्रा दादी, कुरुंग कुमेय व लोंगडिंग जिल्ह्यांत पुराची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. पूर्व कामेंग जिल्ह्यात भूस्खलनात दोन कुटुंबांना घेऊन जाणारे वाहन वाहून गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला.
मणिपूर : पुराचे पाणी घरात
इम्फाळ : मणिपूरमध्ये नद्यांना पूर आले असून, यामुळे १९,८११ लोक प्रभावित झाले आहेत. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर येऊन ३,३६५ घरांचे नुकसान झाले. हेइगांग, वांगखेई व खुरई विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक हानी झाली आहे. राज्यात भूस्खलनाच्या ४७ घटना घडल्या आहेत.
केरळ : वीजपुरवठा बंद
तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे मूलभूत सोयीसुविधांचे नुकसान झाले आहे. वीज महामंडळाच्या २६,३३९ खंबांचे नुकसान झाले. यामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. यात एकूण १६४.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.