उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यामध्ये एक मोठा रेल्वे अपघात सुदैवाने टळला आहे. येथे रात्री काही समाजकंटकांनी शामली आणि बलवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रुळांवर भलामोठा आणि अवजड लोखंडी पाईप ठेवला होता. त्या माध्यमातून ट्रेनला रुळांवरून उतरवण्याचा डाव होता. मात्र ट्रेनच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून ट्रेन आधीच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली.
शामली आणि बलवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञातांनी सुमारे १० फूट लांब सिमेंटचा पाईप आणि १५ फूट लांब लोखंडाचा पाईप ठेवला होता. तसेच रुळांवर अनेक दगड ठेवल्याचंही दिसून आलं. मात्र ट्रेनच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि मोठा अपघात टाळला. या घटनेची माहिती मिळताच बड्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी रेल्वे रुळांवरील अडथळा दूर करण्याचे काम तातडीने सुरू केले आणि सुमारे तासाभरानंतर ट्रेनला पुढे रवाना केले.
दरम्यान, या घटनेमागे काही समाजकंटक असू शकतात, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. अशा प्रकारांमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आता पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.