ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीतील गोविंदपुरी येथे ९ व १० वर्षाच्या दोघा अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरुन २३ वर्षाच्या तरुणाची हत्या केली आहे. या मुलांनी तरुणाच्या छातीवर बसून बॉटलने त्या तरुणाच्या गळ्यावर वार केला असून या घटनेने अल्पवयीन वाढत्या हिंसक वृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गोविंदपुरी येथील एका मंदिराबाहेर संजय कुमार (वय २३ वर्ष) हा तरुण फुलविक्रेत्याचे काम करतो. संजय कुमार परिसरातील दुस-या दुकानाजवळ रात्री उशीरा मद्यपान करत असताना ९ व १० वर्षांची दोन अल्पवयीन मुलं त्यांच्याजवळ दान मागत होते. संजयने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यावरुन त्या मुलांसोबत संजयचा वाद झाला. यादरम्यान संजयने एकाच्या कानशिलात लगावली. संतापाच्या दोन्ही मुलांनी संजयवर हल्ला चढवत त्याच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडली तर दुस-याने धक्का मारुन संजयला खाली पाडले. यानंतर एकाने संजयच्या छातीवर बसून बिअरच्या बॉटलने संजयचा गळा चिरला.
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या मुलांनी वर्षभरापूर्वी गावातून पळ काढून दिल्ली गाठल्याची कबूली दिली. त्यांचे वडिल गावी सायकल रिक्षा चालवतात. दोघेही गोविंदपुरीतील मंदिरात भीक मागतात. संजय कुमारने ब-याचदा या मुलांना जेवण दिल्याचे स्थानिकांनी सांगितले. दोन्ही मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन असल्याची चर्चा आहे.