किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 06:55 IST2025-08-16T06:54:01+5:302025-08-16T06:55:03+5:30
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले ...

किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
माचैल माता यात्रेसाठी किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील चशोटी गावात हजारो भाविक पोहोचले होते तेव्हा हा अपघात झाला. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जिथून सुरू होणार होती त्या ठिकाणी ढग फुटले. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती. सर्व पुरात वाहून गेले.
किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा म्हणाले की, एनडीआरएफची टीम शोध-बचाव कार्यात गुंतली आहे. आणखी दोन पथके मार्गावर आहेत. आरआरचे जवानही या कामात गुंतले आहेत.
बचावलेल्यांचे अनुभव
चशोटी येथून बचावलेले आलेले राकेश शर्मा म्हणाले की, मी माझ्या मुलासह ढिगाऱ्याखाली गाडले गेलो, पण लाकडाचा एक मोठा तुकडा आमच्यावर पडला. त्यामुळेच आमचे प्राण वाचले.
बचावकार्यात कोण?
प्रत्येकी ६० जवानांची पाच लष्करी पथके (एकूण ३००), व्हाईट नाईट कॉप्सचे वैद्यकीय पथक, जम्मू आणि काश्मीर पोलिस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी या ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.
दिल्लीत छत कोसळून ६ जणांचा मृत्यू
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील हुमायूंच्या कबर कॅम्पसमधील दर्गा शरीफ पट्टे शाहच्या एका खोलीचे छत शुक्रवारी संध्याकाळी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ जणांना वाचवण्यात आले आहे.
घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. सुरुवातीला कबरीचा घुमट कोसळल्याचे वृत्त होते. प्रत्यक्षदर्शी विशाल कुमार म्हणाले, मी हुमायूंच्या कबरीत काम करतो. अचानक मोठा आवाज आला आणि माझा पर्यवेक्षक धावत आला. आम्ही लोकांना आणि प्रशासनाला बोलावले व अडकलेल्या लोकांना हळूहळू बाहेर काढले.