'गलवान'मध्ये ४२ चिनी सैनिक ठार; भारतीय जवानांसोबतचे भांडण पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:10 IST2022-02-04T13:08:10+5:302022-02-04T13:10:02+5:30
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राचा दावा

'गलवान'मध्ये ४२ चिनी सैनिक ठार; भारतीय जवानांसोबतचे भांडण पडले महागात
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जून २०२०मध्ये भारत आणि चीनचे सैनिक भिडले. या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. मात्र, चीनने मृत सैनिकांची संख्या कायम लपवली. केवळ ४ सैनिक मरण पावल्याचे चीनने म्हटले हाेते. आता या प्रकरणात हिंसक झटापट सुरू असताना चीनचे ३८ सैनिक वाहून गेल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'ने दिले आहे. त्यामुळे गलवान संघर्षात चीनचे ४२ सैनिक मरण पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
'गलवान डिकोडेड' नावाचे हे वृत्त 'द क्लॅक्सन'च्या स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांच्या टीमने प्रसिद्ध केले आहे. भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अनेक जवान गलवान नदीत वाहून गेले होते, अशी माहिती 'द क्लॅक्सन'ने प्रसिद्ध केली आहे.गलवानमध्ये रात्रीच्या सुमारास झटापट झाली. त्यावेळी चीनचे कमीत कमी ३८ सैनिक नदीत बुडाले, असा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेईबोच्या हवाल्याने करण्यात आला हाेता.
गलवानमधील संघर्षात केवळ ४ सैनिक मारले गेल्याचा दावा चीन सरकारने केला होता. 'त्या रात्री नेमके काय घडले, कोणत्या कारणामुळे झटापट झाली, संघर्ष पेटला, याबद्दलची सगळीच माहिती चीनकडून लपवण्यात आली. चीनने जगाला धादांत खोटी माहिती दिली. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग्स आणि पेजेस डिलीट केले. मात्र, चीनमधून मिळालेल्या डिजिटल अर्काईव्हमधून वेगळाच तपशील पुढे आला आहे', असे 'द क्लॅक्सन'ने वृत्तात म्हटले आहे.
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन साेहळ्यावर भारताचा बहिष्कार-
कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक २०२२ ला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या सैनिकाला टॉर्च बेअरर बनविताच भारताने कडाडून विरोध केला. ‘आमच्या देशाचे राजदूत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत,’ असे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘चीन ऑलिम्पिकआडून राजकारण खेळत आहे, ही दुर्दैवी बाब म्हणाली लागेल. बीजिंगमधील भारताचे कार्यवाहक राजदूत हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनात किंवा समारोप सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.’