'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:10 IST2025-05-13T09:06:03+5:302025-05-13T09:10:10+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइट्वर सायबर हल्ले करत आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्ताननेही सीमेवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या काळात भारतावर १५ लाख सायबर हल्ले झाल्याचे समोर आले.
हे सायबर हल्ले भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले. फक्त १५० सायबर हल्ले थांबवता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातून करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइटना लक्ष्य करत आहेत.
बांगलादेश आणि पश्चिम आशियातूनही सायबर हल्ले झाले. महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी दावा फेटाळला
हॅकर्सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरल्याचे, विमान वाहतूक आणि महानगरपालिका यंत्रणेत घुसखोरी केल्याचे आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचे दावे महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.
महाराष्ट्र सायबर कार्यालय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे नोडल कार्यालय आहे. हे सायबर गुन्ह्यांच्या तपास आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, भारतातील सायबर हल्ले कमी झाले आहेत पण पूर्णपणे थांबलेले नाहीत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियाई देशांमधून हे हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्र सायबर कार्यालयाने इंटरनेट माध्यमांवरील बनावट माहितीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि ८३ पैकी ३८ बनावट बातम्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.
ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूकेसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिक तात्काळ मदतीसाठी १९४५ आणि १९३० वर डायल करू शकतात. - कॉल आल्यानंतर, विश्लेषक कॉलरशी संपर्क साधतात. सुमारे १०० फोन लाईन्स एकाच वेळी काम करत आहेत. - १९३० आणि १९४५ या दोन्ही क्रमांकांवर दररोज सात हजार कॉल येतात. सायबर फसवणूक करणाऱ्यांवर वेळेवर कारवाई करून, २०१९ पासून ६०० कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत २०० कोटी रुपये वाचले आहेत.