मनपाच्या जलतरण तलावात पोहताना युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:58 IST2018-11-03T13:56:25+5:302018-11-03T13:58:21+5:30
तलावात पोहण्याचा सराव करताना अचानकपणे त्याचा श्वासोच्छवास बंद पडून हालचाल थांबल्याचे तेथील जीवरक्षक राजू वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तलावात उतरून देवव्रतला बाहेर काढले.

मनपाच्या जलतरण तलावात पोहताना युवकाचा मृत्यू
नाशिक : गंजमाळ येथील रहिवाशी असलेला व लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात पदवीच्या शिक्षण घेणारा देवव्रत सदाशिव गायकवाड(१८) याचा महापालिकेच्या सावरकर जलतरण तलावात पोहत असताना मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, त्र्यंबकरोडवरील महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावामध्ये मागील अडीच वर्षांपासून देवव्रत हा पोहण्याच्या सरावासाठी जात होता. नेहमीप्रमाणे शनिवारी (दि.३) सकाळी एन.डी.पटेल रस्त्यावरील पाठीमागील बाजूस असलेल्या जीवनज्योत सोसायटीमधील राहत्या घरातून तो बाहेर पडला. सकाळच्या बॅचमध्ये त्याने जलतरण तलावात प्रवेश मिळविला. दरम्यान, तलावात पोहण्याचा सराव करताना अचानकपणे त्याचा श्वासोच्छवास बंद पडून हालचाल थांबल्याचे तेथील जीवरक्षक राजू वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तलावात उतरून देवव्रतला बाहेर काढले. सुरक्षारक्षक जगन्नाथ बोर्डे यांच्या मदतीने वायकर यांनी त्वरित सकाळी ८ वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकिय अधिकारी यांनी देवव्रतला तपासून मयत घोषित केले.
देवव्रत हिरे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम वर्षाल शिक्षण घेत होता. गायकवाड कुटुंबाचा तो एकूलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, बहीण, मामा असा परिवार आहे. त्याच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्हा रुग्णालय परिसरात त्याचे नातेवाईक, मित्र परिवाराने गर्दी केली होती. महापौर रंजना भानसी यांनीही रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.