येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:30 IST2019-03-09T18:29:31+5:302019-03-09T18:30:22+5:30
येवला येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

येवला येथील कार्यशाळेत विणकर बांधवाना मार्गदर्शन करताना रेशीम विकास अधिकारी सी. के. बडगुजर. समवेत व्यासपीठावर डॉ. उदय जावळी आदींसह उपस्थित मान्यवर.
येवला : येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेशीम तंत्रज्ञान व संशोधन केंद्रातील वैज्ञानिक डॉ. उदय जावळी, शिवकुमार मुरगुड, बसवराज हरकल, प्रमोद कक्कनवार, रेशीम विकास अधिकारी श्री शंकर, सी. के. बडगुजर, शांतीलाल भांडगे, माधवराव खळेकर, येवला मर्र्चण्ट बँकेचे संचालक मनोज दिवटे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उदय जावळी यांनी विणकर बांधवांना हातमाग व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, हातमाग व्यवसायात दक्षिण भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उत्पादने घेतली जातात. अशाच प्रकारे येवल्यातील विणकरांनी व्यवसायात नवीन तांत्रिक बदल केल्यास उत्पादनात वाढ होईल तसेच शारीरिक श्रमदेखील कमी होतील. हातमाग व्यवसायात हातमाग जकार्डकरिता नवीन आलेल्या लिफ्टिंग मशीनचे प्रात्यक्षिक विणकरांना दाखविण्यात आले. या मशीनचा उपयोग केल्यास विणकरांचे शारीरिक श्रम कमी होणार असून, भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधीपासून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मशीनचा जास्तीत जास्त विणकरांनी उपयोग करावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.