गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:34 IST2020-06-04T19:33:43+5:302020-06-04T19:34:13+5:30
गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली.

गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला
नाशिक : शहरासह जिल्ह्यात बुधवारी (दि.३) सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरूच होती; मात्र संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरणक्षेत्रात गुरूवारी (दि.४) सकाळी सहा वाजेपर्यंत १२५ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे.
मुंबईकडून उत्तर महाराष्टÑाकडे निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात जाणवला. बुधवारी सकाळपासून संध्याकाळी साडे ५ वाजेपर्यंत १७ मिमी पर्यंत पाऊस नोंदविला गेला. बुधवारी दुपारनंतर सरींची रिपरिप मुसळधार पावसात बदलली. त्यावेळी शहरात ताशी ३० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. संध्याकाळनंतर मुसळधार वादळी पावसाने शहराला झोडपून काढले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जोर‘धार’ वादळी पाऊस शहरात सर्वत्र सुरू होता. रात्री साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत ५२.३ तर साडेदहा ते साडे अकरा वाजेपर्यंत केवळ तासाभरात शहरात ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या तीन तासांत ११८ मिमी इतका पाऊस शहरात झाला यासोबतच गंगापूर धरणक्षेत्रातसुध्दा पावसाचा वेग वाढल्याने जवळपास १०० मिमी इतका पाऊस रात्री आठ वाजेपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पडला. वाऱ्याचा वेगदेखील ताशी ५० ते ६० किमी असा होता. गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात ३० दलघफूने वाढ होऊन साठा २ हजार ६९९ पर्यंत पोहचला. तसेच काश्यपी धरणाच्या क्षेत्रात ५७ मिमी इतका पाऊस पडला तर गौतमी गोदावरी धरणक्षेत्रात ३३ मिमी पाऊस झाला आणि अंबोली व त्र्यंबकेशवर परिसरात प्रत्येकी ३८ मिमी इतका पाऊस झाला. गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली.