पोलिसांचा दणका : कायद्याचे उल्लंघन अन् मास्क न वापरणे १ हजार लोकांना भोवले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:03 IST2020-07-02T21:01:53+5:302020-07-02T21:03:37+5:30
आजपर्यंत शहरात मास्कचा वापर टाळणा-या ५ हजार २०५ नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच वेळमर्यादेचे उल्लंघन करणा-या १० अस्थापनांविरूध्द कारवाई करण्यात आली.

पोलिसांचा दणका : कायद्याचे उल्लंघन अन् मास्क न वापरणे १ हजार लोकांना भोवले !
नाशिक : शहर व परिसरात जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व मास्क वापरण्याच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता वहणा-या बेजबाबदार नागरिकांविरूध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरूवारी (दि.२) दिवसभरात एकूण १ हजार २८३ लोकांविरूध्द थेट गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मागील दोन दिवसांत शहरात वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणा-या बेशिस्त वाहनचालकांना २ लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड ठोठावला गेला आहे.
महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व दुकाने पाच वाजेपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळ होताच विनाकारण कोणीही घराबाहेर पडणार नाही, ‘नाईट कर्फ्यू’ सक्तीने लागू केला आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उल्लंघन केले जात आहे. यामुळे आता पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
गुरु वारी दिवसभरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या २३ इसमांवर अदलखापात्र गुन्हे नोंदविले गेले तसेच २२ मार्च ते २ जुलै या कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण १० हजार २८१ लोकांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ८५० नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहे. आजपर्यंत शहरात मास्कचा वापर टाळणा-या ५ हजार २०५ नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच वेळमर्यादेचे उल्लंघन करणा-या १० अस्थापनांविरूध्द कारवाई करण्यात आली.
४०० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
नाशिक शहरात दुचाकीवरून केवळ एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील दोन व तीन व्यक्ती दुचाकीवरून प्रवास करताना आढळून आलेल्या ३९५ बेशिस्त चालकांवर तसेच ५ चारचाकी वाहनचालक अशा ४०० वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
२१ हजारांचा दंड वसूल
शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून १ ते २ जुलैदरम्यान २ लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी २० हजार ९०० रु पयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, ‘डिस्टन्स’चे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.