पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:58 IST2019-06-04T01:58:00+5:302019-06-04T01:58:16+5:30
वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन
नाशिक : वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरठेठाक पडल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मनमाड मुख्याधिकाऱ्यांनी पाणी नियोजन वेळेत न केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे नियोजन करून पालखेड डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्यानंतर आता पालखेडमधून पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणातून लाभक्षेत्रातील बिगर सिंचनासाठी मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, येवला नगरपरिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना विंचूर, लासलगाव, आंगेगाव या संस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून ४८० दलघफू पाणी दि. २ ते १० जून या कालावधीत आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन कालावधीत पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षतादेखील घेण्यात आली आह े.
आवर्तन सोडण्याच्या कालावधीत २२ तास वीजबंदी करण्यात आली असून, फक्त सकाळी २ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, सर्व पाणीवापर संस्थांना पाणी पोहोच करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्यामुळे तशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या असून, पाटबंधारे विभागानेदेखील अनधिकृत पाणी ओढणाºयांवर कारवाई केलेली आहे.
दोन हजार डोंगळे उद्ध्वस्त
पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालखेडमधून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी कालव्यातील सुमारे दोन हजार डोंगळे उद्ध्वस्त करण्यात आले. कालव्यातील जमिनीखालून पाईप टाकून पाण्याची चोरी केली जाते. सदर पाईप काढून ते जप्त करण्यात आले आहेत.