परतीच्या पावसाने पांढरे सोनेही काळवंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:09 IST2020-10-22T21:12:52+5:302020-10-23T00:09:27+5:30
सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.

परतीच्या पावसाने पांढरे सोनेही काळवंडले
सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.
मागील वर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी कांदा पिकाला मिळालेले चांगले बाजार भाव व करोनामुळे कापुस वेचणीसाठी परराज्यातील मजुर येतील का ? यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीपिकाचा पेरा ४० टक्क्याने कमी केला. या वर्षी तालुक्यात केवळ ९ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रात कपाशीपिकाची लागवड करण्यात आली आहे.
सततच्या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबिन, मका, मुग, भुईमुग आदी पिकांची नासाडी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी अस्मानी -सुलतानी संकटाने बेजार झाला आहे. तालुक्यात कापुस वेचणीच्या हंगामाला सुरूवात होताच परतीच्या पावसाने झोडपल्याने कापसाची प्रत खराब झाली आहे. गावागावात खाजगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी सुरु केली आहे.
राज्य शासनाने कापसाला ५८२५ रुपये प्रति क्विंटलला हमीभाव जाहिर केला आहे. मात्र खाजगी व्यापारी केवळ ३८०० ते ४२०० रूपये प्रति क्विंटल दराने कापुस खरेदी करत आहे. रेन टच च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट होत आहे.
पूर्व मशागती पासुन ते वेचणीपर्यंत कपाशीपिकाला एकरी ३० हजार रूपये खर्च येतो. यंदाच्या अती पावसाने आलेल्या करपा व लाल्या रोगामुळे उत्पादन निम्म्याने घटले आहे. केवळ ऐकरी सरासरी ४ ते ७ क्विंटल पर्यंत उत्पादन पदरात पडणार आहे. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा लेखाजोखा बघता शेतकऱ्यांच्या पदरी ढब्बु ही शिल्लक राहाणार नसल्याचेच चित्र आहे.
यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाने, करप्या व लाल्या रोगामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य द्यावे. उत्पादन घटल्याने बाजार भावतेजीत राहतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरत आहे.
- पोपट उशीर, कापूस उत्पादक शेतकरी, सायगाव