थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 05:54 PM2019-02-03T17:54:33+5:302019-02-03T17:55:09+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अडीचहजार रूपयांपेक्षा जास्त थकीत असलेल्या नळधारकाचे नळ कनेक्शन खंडीत करण्याच्या निर्णय घेण्यात आला. सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत सर्वानुमते सदरचा ठराव करण्यात आला.
![A resolution to discontinue the dues of the outstanding holders | थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याचा ठराव A resolution to discontinue the dues of the outstanding holders | थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याचा ठराव](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/03water_201902191354.jpg)
थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याचा ठराव
अडीच हजार रूपयांच्या पुढील थकबाकी असणारे गावातील सुमारे २५० नळधारकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. आठ दिवसाच्या आत थकबाकी धारकांनी पैसे भरले नाही तर नळ कनेक्शन खंडीत केले जाणार आहे. ठाणगाव गावाला उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी पुरवठा योजना २००७ पासून राबविण्यात आलेली आहे. बारामाही सुरु राहणारी ही एकमेव योजना असून या योजनेचे वीजबील सुमारे दहा लाखांच्या आसपास थकलेले आहे. आगामी काळात वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने २५० नळधारकांची अडीच हजार रूपयाच्या पुढे थकबाकी असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा बैठकीत सर्व सदस्यांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. कारवाई करण्याअगोदर गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत नळधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. याबाबत पंचायत समितीच्यावतीने ही ठाणगाव ग्रामपंचायतीस नोटीस बजावून वसुली बाबत सुचना करण्यात आली आहे.