धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:23 IST2018-11-27T00:23:09+5:302018-11-27T00:23:37+5:30
राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.

धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे
सातपूर : राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला. अशोकनगर येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने व बीएमए ग्रुपच्या सहकार्याने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमप्रसंगी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे होते. यावेळी प्रा. अंधारे म्हणाल्या की, केंद्र सरकार मूळ विषयापासून दूर गेले असून, जनतेची दिशाभूल करण्यासाठी मंदिराचा मुद्दा पुढे करीत आहे. मुळात जनतेला मंदिर, मशीद किंवा विहार नको आहे तर विकासाची अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी अगोदर संविधानाची अंमलबजावणी करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. देशातील जनतेने वारंवार ईव्हीएम मशीनविषयी शंका उपस्थित करूनही केंद्र सरकार मात्र ईव्हीएम बदलण्यास तयार नसून यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते शिलरत्न, भन्ते धम्मरत्न, राहुल बच्छाव, कविता कर्डक, वाय. डी. लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज पगारे यांनी केले. सूत्रसंचालन जगन्नाथ भरीत यांनी केले. यशवंत तेलोरे यांनी आभार मानले. यावेळी संजय भरीत, यशवंत भवरे, भगवान भालेराव, सुभाष पोटभरे, रुपराव तायडे, मधुकर खंडवी आदी उपस्थित होते. व्याख्यानानंतर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्र म घेण्यात आला.
बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल
घटनेनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. बहुजनांची मुले जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने या सर्व शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे तसेच खासगी शाळांचे शुल्क माफ केले पाहिजे तरच बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असा आशावाद सुषमा अंधारे यावेळी व्यक्त केला.