यंदा महाराष्टत जसे उन्हाळ कांद्याचे अमाप पीक आले, तसेच लगतच्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्येदेखील कांद्याच्या पिकाने शेतक-यांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु लहरी हवामान व बेभरवशाच्या निसर्गाचा यंदा मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातला फटका बसला. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये यंदा एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट आल्याने तेथील शेतक-यांनी फेब्रुवारी, मार्चमध्ये घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. परिणामी दरवर्षी महाराष्टच्या उन्हाळ कांद्यासोबत बाजारात ‘भाव’ खाणारा परराज्यातील कांदा यंदा बाहेर पडलाच नाही. त्यामुळे देशासह परदेशाची कांद्याची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्टवर येऊन पडली. सुदैवाने यंदा निसर्गाने महाराष्टवर कृपा केली. उष्णतेची लाट काही प्रमाणात असली तरी, अवकाळी पावसाने शेतक-यांवर दया दाखविली. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिलमध्ये निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यापासून बचावलेल्या कांदा उत्पादकांना त्याचा फायदा झाला. विशेषकरून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला वाढलेली मागणी पाहता, बाजारात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केलेला कांदा बाजारात येण्याच्या वेळीच मागणी वाढल्यामुळे शेतक-यांनी थेट खळ्यावरचा कांदा बाजार समितीत आणला. गेल्या आठवड्यापासून दररोज किमान अडीच ते तीन लाख क्विंटलची आवक बाजार समित्यांमध्ये होऊ लागली असून, तूर्त आणखी महिने-दोन महिने शेतकºयांना याचा लाभ होऊ शकतो. परंतु बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून त्याचा फायदा उचलण्याची तत्परता व व्यावहारिक ज्ञान बाळगून असलेल्या शेतक-यांनी अशा वेळी त्याचा फायदा न उचलला तर नवलच. मात्र शेतक-यांचा हाच आततायीपणा त्यांच्या नुकसानीला पूरक ठरू शकतो. चाळीत साठवून ठेवलेला सर्वच कांदा चांगल्या बाजारभावाच्या आमिषाने लिलावासाठी आणला तर बाजार व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे आवक वाढली की भाव पडतात याचा अनुभव येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कांद्याला सध्या मिळणारा भाव टिकवून ठेवण्याची जबाबदारी व्यापा-यांवर नव्हे तर कांदा उत्पादकांवर असून, त्यामुळे की काय बाजार समित्यांनी उत्पादकांना कमी प्रमाणात कांदा लिलावासाठी आणण्याचे आवाहन केले आहे. तसे झाल्यास येणा-या काही काळासाठी कांदा निश्चित ‘भाव’ खाईल यात दुमत नाही. परंतु सरकारला कांद्याचे ‘भाव’ खाणे कितपत मानवेल हे सांगता येत नाही. कारण सरकारला पिकविणा-यापेक्षा खाणा-यांचीच अधिक चिंंता असते हा आजवरचा अनुभव आहे.
कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’
By किरण अग्रवाल | Updated: June 24, 2018 01:13 IST
आवक कमी झाली की बाजारभाव वधारतो व आवक वाढली की भाव पडतो या बाजारपेठेच्या आर्थिक नियमांमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी फायदा तर कधी मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु गेल्या सप्ताहात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला तब्बल १३०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने साहजिकच गेल्या दोन महिन्यांपासून ४०० ते ५०० रुपये दर स्वीकारून कांदाविक्री करणाºया शेतक-यांना तूर्त ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.
कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’
ठळक मुद्देसरकारला पिकविणा-यापेक्षा खाणा-यांचीच अधिक चिंंता मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातला फटका बसलाअवकाळी पावसाने शेतक-यांवर दया दाखविली