शालकांकडून मेहुण्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:29 IST2021-02-19T21:28:32+5:302021-02-20T01:29:42+5:30
सिन्नर : मावस बहीण व दाजीच्या भांडणात समजूत करण्यासाठी गेलेल्या शालकांकडून मावस मेहुण्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बारागावपिंप्री येथे घडली. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत संजय महादू उगले (४०) यांचा मृत्यू झाला

शालकांकडून मेहुण्याचा खून
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित नितीन संपत रोडे (३०), नीलेश संपत रोडे (२८) दोघेही राहणार बारागावपिंप्री ता. सिन्नर या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत संजय उगले यांचे बंधू विष्णू महादू उगले (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारागावपिंप्री येथील नितीन संपत रोडे व नीलेश संपत रोडे यांच्या मावस बहिणीचा विवाह गावातीलच संजय महादू उगले यांच्याशी झालेला आहे. बुधवारी मावस बहीण व दाजींमध्ये भांडण झाल्यानंतर नितीन व नीलेश रोडे हे दोघेही संजयला समजावून साांगत असतानाच त्यांच्यात वाद झाले. त्यातच नितीन रोडेच्या हातातील लाकडी दांडक्याचा प्रहार संजयच्या डोक्यात बसल्याने तो जागीच गतप्राण झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
घटनेनंतर सिन्नर नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासंदर्भात मयताचा भाऊ विष्णू उगले याने मुसळगाव एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित नितीन आणि नीलेश रोडे या दोघा भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एस. गरुड, हवालदार सुनील जाधव, विनोद जाधव, राम हरळे करत आहेत.