मनीषा चोपडे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम
By Admin | Updated: January 20, 2016 22:24 IST2016-01-20T22:24:02+5:302016-01-20T22:24:30+5:30
देवगाव : मुलीच्या न्यायासाठी माता-पित्याचा आक्रोश

मनीषा चोपडे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम
विंचूर : ‘‘परिस्थिती गरिबीची असली तरी मनीषाला शिकायची इच्छा होती.. पण त्या राक्षसांनी माझ्या मनीषाला कायमचं संपवलं... नियतीला माझ्या पोरीचं स्वप्न पाहवलं नाही.. माझी मनीषा कायमचीच गेली हो...’’ - कठोर काळजालाही मायेचा पाझर फुटावा असा माता-पित्याचा आक्र ोश तीन आठवड्यांनंतरही कायम आहे. लेकराला किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, अशी रास्त अपेक्षा या गरीब आई-वडिलांची आहे.
निफाड तालुक्यातील देवगाव येथील मनीषा संजय चोपडे हिच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. गेल्या महिन्यात थरकाप उडवून देणारी घटना देवगाव येथे घडली. चोपडे कुटुंबीयातील अकरावीत शिकणाऱ्या मनीषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह घरानजीक आढळून आला.
चोपडे यांच्या घरात तीनही कन्यारत्न. थोरल्या मुलीचा विवाह झालेला. धाकटी नववीत, तर मनीषा अकरावीत शिक्षण घेत होती. आम्ही बाहेरगावी गेलेलो, तर मनीषा शाळेत गेलेली. अशा वेळी शेजारील वस्तीच्या माणसाचा फोन येतो काय, आणि मनीषाचा मृतदेह समोर दिसतो काय.. भरल्या डोळ्याने मन सुन्न करणारा प्रकार सांगताना आई-वडिलांना आपले दु:ख लपवता आले नाही. कोणत्याही परिस्थितीत मनीषाला न्याय मिळवूनच देऊ, अशी मनाशी खूणगाठ बांधलेला निश्चय त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. वर्गात सर्वांशी हसून खेळून राहणाऱ्या मनीषाचा असा दुर्दैवी गूढ मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे. आजही गावात संतप्त आणि दहशतपूर्ण वातावरण आहे.
मनीषाने आत्महत्त्या केलेली नसून वस्तुस्थिती बघता तिचा घातपात झाल्याचे कुटुंबासह गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणाचा पोलीस खात्याकडून तत्काळ तपास पूर्ण करण्यात येऊन आरोपींना गजाआड करून मनीषाला न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रारंभी आत्महत्त्येच्या प्राथमिक निष्कर्षाला पोहोचलेल्या पोलिसांना गावकऱ्यांचा रोष बघून अखेर खुनाचा गुन्हा नोंदवावा लागला. इतके दिवस उलटूनही तपासात प्रगती नसल्याचा आरोप करीत सदर प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी चोपडे कुटुंबीयांनी केली आहे.
आमची मनीषा गेली, ती परत येणे शक्य नाही, पण किमान इतर कुणाच्या घरात तरी मनीषा प्रकरण घडायला नको म्हणून मारेकऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.
मनीषाचा खून करून आत्महत्त्या भासविण्यासाठी शेतात मृतदेह अर्धवट जाळण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मनीषाला न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा मृत मनीषाचे काका राजेंद्र चोपडे
यांनी व्यक्त केली. या प्रकरणी २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)