अतिक्रमणांमुळे कोंडला श्वास
By Admin | Updated: January 20, 2016 22:29 IST2016-01-20T22:28:06+5:302016-01-20T22:29:10+5:30
सटाणा : नगरपालिका प्रशासनाची भूमिका तळ्यात-मळ्यात

अतिक्रमणांमुळे कोंडला श्वास
सटाणा : शहरातील साठफुटी रस्त्यावरील अतिक्र मणांमुळे अक्षरश: शहराचा श्वास दाबून धरला आहे. बायपास रखडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने ज्येष्ठ नगरसेवकांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी
जोर धरू लागली आहे. त्यामुळे नगररचना विभाग आणि पालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना मोबदला घेऊन गाशा गुंडाळा
अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी भूमिका घेत एक महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. मात्र तीन महिने उलटूनही पालिका प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरामधून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वाढत्या अपघातांमुळे अनेक निष्पापांचे बळी गेल्याने बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मागणीसाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे. त्याला तात्पुरता पर्याय म्हणून आता पालिका प्रशासन आणि नगररचना विभागाने साठफुटीचा मार्ग अवलंबला आहे. वकील संघाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अभियंता शालिमार कोर, नगररचना विभागाचे सोमनाथ केकांग यांनी अतिक्र मणधारकांसह ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, गटनेते काका रौंदळ, नगरसेवक सुमनताई सोनवणे, कौश्यल्याबाई सोनवणे यांची तातडीची बैठक घेतली होती.
यावेळी सर्वच अतिक्रमणधारकांशी चर्चा करून वाढीव चटईक्षेत्र, विकास हस्तांतरण हक्क, आर्थिक मोबदला असे तीन पर्याय अतिक्रमणधारकांपुढे ठेवले. या तिन्ही पर्यायांपैकी एक पर्याय निवडून एक महिन्याच्या आत अतिक्रमण काढून शहर विकासास हातभार लावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी केले. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे साठफुटी रस्त्याचे काम रखडले आहे.
येत्या महिनाभराच्या आत हा रस्ता मोकळा न केल्यास पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन पुकारू, असा इशारा माजी आमदार संजय चव्हाण यांनीदेखील दिला होता. मात्र ना कोणाला आंदोलनाची आठवण राहिली, ना पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची हिंमत दाखवली. पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून साठफुटीचा विकास रखडला आहे. परिणामी मार्ग रोखून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.
शहरातील ताहाराबादरोड या मुख्य रस्त्यावरील वर्दळीचा ताण कमी करण्यासाठी नगररचना विभागाने समांतर रस्ता म्हणून साठफुटी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता सुरु वातीपासूनच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पं. ध. पाटील नगरात काही बंगल्यांच्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिल्यामुळे या रस्त्याचा विकास कोर्टकचेरीतच अडकला. कोर्टातही पालिका प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली. ते प्रकरण मिटत नाही तोच या रस्त्यावर चौगाव रोडनजीक तेरा जणांनी पक्की बांधकामे करून पूर्णपणे रस्ता अडवला आहे. हा रस्ता नामपूररोड ते शिवाजीनगरपर्यंत विकसित करण्यात आला आहे. मात्र या तेरा जणांच्या अतिक्रमणांमुळे हा समांतर रस्ता अद्यापही मालेगावरोडला जोडता आलेला नाही याबाबत अनेक
वेळा विविध संघटना तसेच नगरसेवकांनी देखील आवाज उठवून साठफुटी रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती; मात्र राजकीय दबावापुढे पालिका प्रशासनाने वेळोवेळी
गुडघे टेकण्याचे काम केल्याचे दिसून येते. (वार्ताहर)