नाशिक शहरासह जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे; मात्र गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. यामुळे धरण ६१.८७टक्के भरल्याने विसर्गात सोमवारी (दि.२३) दुपारी दोन वाजता दुपटीने वाढ करण्यात आली. ६ हजार १६०क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे. गाेदावरीला पुन्हा पुरसदृश्य स्थिती सायंकाळी चार वाजेपर्यंत निर्माण झाली होती.
नाशिक शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात मात्र पावसाचा जोर टिकून आहे. गंगापुर धरणात पाणलोटक्षेत्रातून सकाळी सहा वाजेपर्यंत मागील २४ तासांत १६१दलघफु इतकी पुरपाण्याची नवीन आवक झाली. पाणलोट क्षेत्रातील आंबोलीमध्ये ७२ तर त्र्यंबकेश्वरला ३५ आणि गौतमी गोदावरी परिसरात ३० मिमी इतका पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत मोजण्यात आला. दिवसभर पावसाची संततधार पाणलोट क्षेत्रात कायम असल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दुपारी एक वाजेच्या सुमारास याबाबत सावधानतेचा इशारा जाहीर करण्यात आला. दुपारी दोन वाजता विसर्ग ३ हजार ९४४ वरून ६ हजार १६०क्युसेक इतका करण्यात आला. यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत गोदावरी नदीला पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. रामकुंडात होळकर पुलाखालून ७ हजार २०४ क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाले होते.
नाशिककरांचे पारंपरिक पुरमापक असलेल्या दुतोंड्या मारूतीची मुर्ती कंबरेपर्यंत बुडाली. रामकुंडावरील गंगा-गोदावरी प्राचीन मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला आहे. बाणेश्वर मंदिरासह सिद्ध पाताळेश्वर मंदिर पाण्यात बुडाले आहे. तसेच गोदावरी नदीवरील नारोशंकर मंदिराजवळ असलेला सर्वात कमी उंचीचा ‘रामसेतू’ला पुराचे पाणी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास लागले. यामुळे गोदाकाठी असलेल्या विक्रेत्यांनी आवरासावर करत स्थलांतर केले.