वडाळागावात भूमिगत गटारीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:32 IST2018-08-12T22:34:52+5:302018-08-13T00:32:53+5:30
वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

वडाळागावात भूमिगत गटारीवर अतिक्रमण
इंदिरानगर : वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वडाळागावात ४५ वर्षांपूर्वी शेती केली जात होती. कालौघात या भागात वस्ती वाढल्याने प्रत्येकाने आपल्या कुवती व जागेनुसार बांधकामे सुरू केली. सध्या गावात जागाच शिल्लक राहिलेली नाही, अशा परिस्थितीत गावातून गेलेल्या भूमिगत गटारीवर अतिक्रमण करण्यात येऊन त्यावर सुमारे दोनशे ते अडीचशे घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे भूमिगत गटारीची साफसफाई करताना नेहमीच अडचण निर्माण होत असून, साफसफाईअभावी भूमिगत गटारे तुंबून रस्त्यावर दुतर्फा पाणी वाहत असते. याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
घाण व दुर्गंधीमुळे डासांचा उच्छाद वाढला असून, नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नेहमीच साथीच्या आजारास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.