पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:47 IST2018-11-05T18:47:11+5:302018-11-05T18:47:32+5:30
देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होत असल्याने शेतीला पुरक पाण्याची सोय राहीली नाही. पावसाळ्यात जुलै, आॅगस्ट महिन्यात आपल्या भागात पाऊस नसतो व भोजापूर धरणात पाण्याची आवक सुरू होते. याचे कारण तिरडे पट्टाकिल्ला येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिमेकडे साधारण १३०० मिलीमीटर ते २१०० मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. व ते पाणी सर्व पश्चिमेकडे वाहून जाते. भोजापूर, देवनदीचा उगम औंढापट्याच्या भागात असून तेथून तिरडी परिसरातील डोंगराचे पाणी म्हाळूंगीत येते. ५० वर्षांपूर्वी कै. वसंतराव नाईक यांच्या पुढाकारातून भोजापूर धरण बांधले गेले. त्यातून सिन्नर-संगमनेर तालुक्यातील ४० गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, आता म्हाळूंगी नदीवर २५ सिमेंट बंधारे बांधले गेले आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनेसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी या धरणातले पाणी आरक्षित झाले आहे. या धरणाची उंची वाढवून अथवा त्यातला गाळ काढून काहीच उपयोग नसल्याचे भाबड यांनी प्रसिध्दिप्रत्रकात म्हटले आहे. भोजापूर धरणात पाणीच नसेल तर त्याचा उपयोग काय म्हाळूंगी, आढळा, औंढापट्टा परिसरातील १२९१ हेक्टर वनविभागाचे व ३०० हेक्टर खासगी क्षेत्रावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळणबंधारे यांच्या माध्यमातून कमी खर्चात ते पूर्वेकडे वळविता येईल. व त्यातून एक ते दिड टीएमसी पाणी भोजापूरकडे वळवल्यास धरणाची साठवण क्षमता दुप्पट होईल. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी व कमी खर्चात सिन्नर तालुक्याचा दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल. त्यातून रब्बी हंगाम घेणे शेतकºयांना शक्य होईल. जनावरांसह शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, याकडे लक्ष वेधत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुढे ही चळवळ व्हावी, असा मतप्रवाह भाबड यांनी व्यक्त केला आहे.