बॅँक एजंटवर धारधार शस्त्राने हल्ला चढवून केली जबरी लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:46 IST2019-02-18T16:44:32+5:302019-02-18T16:46:53+5:30
हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा

बॅँक एजंटवर धारधार शस्त्राने हल्ला चढवून केली जबरी लूट
नाशिक : शहरातील एका बॅँकेचे अल्पबचत प्रतिनिधी म्हणून सिडकोत कार्यरत असलेले घनश्याम दशरथ खैरनार (४४,रा.उपेंद्रनगर) यांच्यावर संशयित तीघा लुटारूंनी जबरी हल्ला चढवून मारहाण करत बॅगेतील दहा ते पंधरा हजारांची रोकडसह दुचाकी लूटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडकोमधील स्वामीनगरात खैरनार हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ठेविदारांकडून अल्पबचतीची ठेव रक्कम जमा करत होते. त्यांच्या हिरोहोंडा दुचाकीवरून फिरत असताना (एम.एच.१५सीओ १२३१) संशायित करण कडूस्कर, ऋषी व भैया (पूर्ण नाव व पत्ते समजू शकले नाही) यांनी दबा धरून खैरनार यांच्यावर हल्ला करत दुचाकीसह ढकलून दिले. यामुळे ते जखमी झाले त्यानंतर तिघांनी धारदार शस्त्राने खैरनार यांच्या हातावर व खांद्यावर सपासप वार करून जखमी केले. हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झालेले होते. पोलिसांनी जखमी खैरनार यांना तातडीने रूग्णालयात हलविले. या जबरी लूटप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फरार हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
सिडकोत गुन्हेगारीत वाढ
खूनासारख्या घटनांसह जबरी लूट नागरिकांची केली जात असल्यामुळे सिडको परिसरात पुन्हा गुन्हेगारीत वाढ झाल्याचे नागरिकांकडून बोले जात आहे. सिडकोत वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस प्रशासनाने वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. कामगारांची वसाहत म्हणून सिडकोची ओळख असून हा परिसर दिवसेंदिवस वेगाने विकसीत होत असून याबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत. यामुळे या भागातील पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.