ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 00:52 IST2021-06-19T00:51:26+5:302021-06-19T00:52:26+5:30
ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.

ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई
नाशिक : ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.
ब्रह्मगिरी,सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत शुक्रवारी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर येथे सुपलीचा मेट या आदिवासी पाड्याजवळ सुरुंग लावून, ब्रह्मगिरीच्या पोटात ‘ब्रम्हा ग्रीन’ या प्रकल्पांतर्गत खासगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे. त्यामुळे माळीणसारखी दुर्घटना होण्याचा संभव असताना, वनविभाग, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासन दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरीप्रमाणेच संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे.
जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात असून, त्यामुळे वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस याचा धोका निर्माण झालेला असल्याचे म्हटले आहे.
या प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी ब्रह्मगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
nसह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी सरकारची असून, सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठीच उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.