प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विसरवाडी-भरडू दरम्यान बोदवड फाट्याजवळील रस्त्यावर अपघात झाला. नवापूर नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी रवींद्र जीवन चौधरी हे मोटरसायकलीने (क्रमांक एम.एच.३९ जी-२३२८) आपल्या पत्नीसाठी औषधे घेण्यासाठी सकाळी नंदुरबारला गेले होते. येताना दुपारी विसरवाडीनजीक रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परंतु फिर्यादीत मात्र वेगळी नोंद करण्यात आली आहे, असा आरोप मयत रवींद्र चौधरी यांचे भाऊ अनिल चौधरी (खांडबारा) यांनी केला आहे. तर विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पोलीस वाहनाने धडक दिलीच नाही उलट पोलिसांनी अपघातग्रस्त युवकाला मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला आहे.
अपघातातील प्रत्यक्षादर्शींकडून मिळवलेल्या माहितीनुसार, अपघात पोलीस गाडीने झाल्याचे सांगण्यात आले आहे. मृत युवकाचे भाऊ अनिल चौधरी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल न करता पोलिसांनी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अनिल चौधरी यांनी सांगितले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे चौकशी करून योग्य कारवाई करून मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा संबंधितांविरुद्ध न्यायालयात गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. या घटनेचा तपास डीवाय.एस.पी. सचिन हिरे हे करीत आहेत.
रवींद्र चौधरी हे घरातील कर्ते पुरूष होते. अपघातात मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. ते नवापूर येथील नेहरू नगरात वास्तव्यास होते. त्यांच्या मूळगावी खांडबारा येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.