लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला बचत गटांना गेल्या वर्षी देण्यात आलेल्या हिरकणी नवउद्योजक पुरस्काराची दोन लाखाची रक्कम वर्ष झाले तर मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या रक्कमेच्या भरोशावर उद्योग उभारलेल्या बचत गटांना आता अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नंदुरबारातील सहेली महिला बचत गटाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागातर्फे गेल्या वर्षी महिला बचत गटांना नवीन उद्योग उभारणीसाठी दोन लाखाचे अर्थसहाय्य बक्षीसाच्या रुपाने दिले गेले होते. नंदुरबार येथील सहेली महिला बचत गटाला देखील हिरकणी योजनेअंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी दोन लाख रुपयांचा चेक स्वातंत्र्यदिनी तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिला गेला होता. या गटाला २०१९-२० या आर्थिक वर्षात निधी मंजूर झालेला आहे. मग २०२०-२१ या वर्षात निधी नाही हे म्हणने कितपत रास्त आहे. ज्यावेळी बचत गटाने कौशल्य विकास विभागाकडे चौकशी केली त्यावेळी निधी मंजुर असल्याचे सांगण्यात आले होते.या रक्कमेच्या भरोशावर बचत गटाने नवीन मशिनरी घेतल, जागा भाड्याने घेऊन कच्चामाल देखील घेण्यात आला. परंतु वर्षभर निधीच मिळाला नसल्याने आता त्याची देयके कशी द्यायची हा प्रश्न बचत गटापुढे आहे. यामुळे युनिट बंद होण्याची वेळ आली आहे. गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला, परंतु नवउद्योजकाचा उद्देशच सफल होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.हिरकणी नवउद्योजक महाराष्टÑाची याअंतर्गत सन २०१९-२० चा आर्थिक वर्षाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे निधी मिळावा यासाठी पाठविला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच हा निधी महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल.-डॉ.रा.म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास.
बक्षीसाची रक्कम वर्ष होऊनही मिळाली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:54 PM