रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर लख्ख रोशणाईने उजाळला असून येथे दिवाळीपूर्वीची दिवाळी आली आहे. त्याला निमित्त आहे या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पर्यटन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून गुजरातमधील केवडीया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी व सरदार सरोवर प्रकल्पाच्या परिसरात शुक्रवार व शनिवारी विविध पर्यटन प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथे आले आहेत. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी व राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. आज दिवसभरात त्यांनी एकता माॅल, चिल्ड्रेन न्यूट्रेशन पार्क, कॅक्टस गार्डन, आरोग्य वन, युनिटी ग्लो गार्डन आणि सरदार पटेल जंगल सफारी तसेच क्रूझचे उद्घाटन केले. जंगल सफारी ही जगातील लक्षवेधी सफारी असून ३७५ एकर क्षेत्रात त्याचा विस्तार आहे. याठिकाणी ११०० जातीचे पक्षी तसेच १०० प्रजातीचे प्राणी आहेत. चिल्ड्रेन पार्क हेदेखील अद्ययावत टेक्नाॅलाॅजीच्या धर्तीवर जगातील पहिले पार्क साकारले आहे. कॅक्टस गार्डनमध्ये सुमारे साडेचारशे प्रकारची कॅक्टस आहेत. आरोग्य वन १७ एकरमध्ये विस्तारले असून त्यात ३८० वनौषधी, वेलनेस सेंटर, योगा, डिजीटल इन्फाॅर्मेशन सेंटर यासह विविध अॅक्टीव्हीज आहेत. ज्या क्रूझचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले त्याची आसन क्षमता २०० असून ते नर्मदेच्या पाण्यात साडेसहा किलोमीटरची ४० मिनिटांची पर्यटकांना सफारी करणार आहे.आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याठिकाणी पर्यटकांसाठी विविध १७ प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात जगातील पहिले सी-प्लेनचे उद्घाटनही शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होईल.एकूणच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ झाले असून याठिकाणी अनेक प्रकल्प जगातील पहिले व मोठे ठरत आहेत. या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून लख्ख रोशणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी डिजीटल रोशणाईने हा परिसर लख्ख उजाळला आहे.
११ गावात ‘बंद’पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने केवडीया परिसरातील ११ गावांनी बंद पाळला आहे. कोरोना वाढण्याच्या शक्यतेने या गावांनी सामूहिकपणे राष्ट्रपतींना पत्र देऊन बंद ठेवण्याचा संयुक्त ठराव केला आहे. ग्रामसभेच्या परवानगीविना कुणीही या गावात प्रवेश करू नये, असा ठराव त्यांनी केला आहे. त्यात कोठी, भुंगलिया, वागडीया, केवडीया गाम, लिमडी, नवागाव, गोरा, वसंतपरा, पिप्रीया, मोठा पिप्रीया, इंद्रवर्ष या गावांचा समावेश आहे.