प्रश्नपत्रिका पाकीट थेट वर्गातच पोहचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:45 PM2020-02-14T12:45:24+5:302020-02-14T12:45:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये अशा सक्त सुचना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटू नये यासठी बंद पाकिट थेट वर्गातच पर्यवेक्षकांना दिले जाणार आहे.
दहावी व बारावीच्या परिक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. कॉपी रोखण्यसाठी आणि परीक्षा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना वेळोवेळी बोर्ड अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. केंद्रसंचालकांची नुकतीच बैठक झाली त्यात विविध बाबींचे मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी केले. यावेळी मंडळाचे सचिव नितीन उपासणी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, कैलास जैन व केंद्रसंचालक उपस्थित होते. उपासणी यांनी मार्गदर्शन केले. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यासाठी यंदा मंडळाने कडक पाऊले उचलली आहेत. यंदापासून पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे बंद पाकिट थेट त्यांच्या वर्गात जावून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून ते फोडले जाणार आहे.
बरेच परिक्षार्थी आपला हात फॅक्चर झाल्याचे भासवून दुसºया लेखनिकाची मागणी करतात. यावर मंडळाने अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्वतंत्र प्रशासकीय पॅनेल तयार करून त्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विभागीय मंडळात बोलविले जाणार आहे.
यात फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास त्यास तात्काळ डिबार करण्यात येणार आहे. ज्या दिवशी विषय शिक्षकांचा पेपर असेल त्या दिवशी ते शिक्षक परीक्षा केंद्र परिसरात येणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.
वर्गात एकापेक्षा अधीक कॉपी केस आढळली तर त्या पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल. याचबरोबर परीक्षा कालावधीत इमारतीतील इंटरनेट सेवा बंद ठेवावी. अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश देवू नये. वर्ग खोल्यांमधील वीज पुरवठा, पाणी, सुस्थितील बेंच याची व्यवस्था करावी.
बालकामगारांना परीक्षा केंद्रात काम देवू नये. तसे आढळल्यास केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल. सहसा शाळेतील परिचरांनाच हे काम देण्यात यावे. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या वेगवेगळ्या दक्षता समित्या आहेत. याशिवाय बैठे पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.