वसतिगृहाअभावी मागास विद्यार्थ्यांची झाली परवड, स्कॉलरशिपच्या अर्जासाठी रेक्टरचे पत्र आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:47 IST2020-12-22T04:46:25+5:302020-12-22T04:47:05+5:30
students : नववी ते १२ वी पर्यंतचे जवळपास दीड लाख विद्यार्थी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतात.

वसतिगृहाअभावी मागास विद्यार्थ्यांची झाली परवड, स्कॉलरशिपच्या अर्जासाठी रेक्टरचे पत्र आवश्यक
- रमाकांत पाटील
नंदुरबार : काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडल्याने दीड लाख विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नववी ते १२ वी पर्यंतचे जवळपास दीड लाख विद्यार्थी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. वसतिगृहातील प्रवेश नक्की होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. दुसरीकडे शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाइन वर्ग बंद झाले. जवळपास निम्म्या जिल्ह्यांत शाळा सुरू होऊन महिना झाला. मात्र वसतिगृहातील विद्यार्थी अद्याप शाळेपासून लांब आहेत. त्यातच १२ वीचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर १० वीची प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण करतील, असा प्रश्न आहे. वसतिगृहातील यादी जाहीर होईपर्यंत शालेय योजनेचा लाभ मिळणार नाही. स्कॉलरशिपच्या अर्जासाठी रेक्टरचे पत्र आवश्यक आहे.
वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, यासंदर्भात आपण विरोधी पक्षनेत्यांना प्रत्यक्ष भेटून व मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यासंदर्भात ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू केली, पण तांत्रिक अडचणींमुळे तेही ठप्प आहेत. अशीच गती राहिली तर पुढील तीन महिनेही प्रवेश प्रक्रिया होऊ शकत नाही.
- राजेंद्रकुमार गावीत,
संस्थाचालक, नंदुरबार