माहुरात लेंडाळा प्रकरणावरुन घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:00 IST2019-05-26T23:57:21+5:302019-05-27T00:00:57+5:30
श्रीक्षेत्र माहूर शहर हे ऐतिहासिक शहर असल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आजही राजे-महाराजे वतनदारांच्या नावे तर काही जमिनी कूळ, इनामी स्वरूपाच्या आहेत़ येथे राजे जसवंतसिंह कृष्णराजसिंह चौहान तसेच राजे हरनाथसिंह चौहान यांच्या नावाच्या सर्वात जास्त जमिनी आजही असून या सर्व जमिनीवर अनेकांनी कब्जे केले आहेत़ त्यामुळे या जमिनीवरुन आता राजांचे वारसदार आणि सध्या ताब्यात असलेल्यांमध्ये घमासान सुरु झाले आहे़

माहुरात लेंडाळा प्रकरणावरुन घमासान
ईलियास बावानी।
श्रीक्षेत्र माहूर : श्रीक्षेत्र माहूर शहर हे ऐतिहासिक शहर असल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आजही राजे-महाराजे वतनदारांच्या नावे तर काही जमिनी कूळ, इनामी स्वरूपाच्या आहेत़ येथे राजे जसवंतसिंह कृष्णराजसिंह चौहान तसेच राजे हरनाथसिंह चौहान यांच्या नावाच्या सर्वात जास्त जमिनी आजही असून या सर्व जमिनीवर अनेकांनी कब्जे केले आहेत़ त्यामुळे या जमिनीवरुन आता राजांचे वारसदार आणि सध्या ताब्यात असलेल्यांमध्ये घमासान सुरु झाले आहे़
माहूर शहरासह तालुक्यात राजे जसवंतसिंह यांच्या नावे पडसा, वडसा, राजगढ, शेकापूर, लाखमापूर यासह अनेक गावांमध्ये १९०० एकरपेक्षा जास्त जमिनी सातबारावर असल्याच्या नोंदी आहेत़ आज रोजी या सर्व जमिनी इतर नागरिकांच्या ताब्यात असून त्या जमिनीवर कर्ज उचलणे, विक्री करणे, फेरफार करणे, आपसी तुकडेबंदी करणे यासह इतर सर्व व्यवहार करण्यात येत आहेत़ यामध्ये वारसा किंवा इतर मालकी हक्कांची चौकशी न करता हे व्यवहार झाले आहेत़ याबाबत माहिती अधिकारात राजांच्या वारसदारांनी माहिती मागितली आहे़ त्यामुळे जमीन खरेदीदार आणि वारसदारांमध्ये संघर्ष अटळ आहे़
राजे जसवंतसिंह कुवर केसरसिंह चौहान यांना दोन मुले होती़ राजे कृष्णराजसिह राजे जसवंतसिंह चौहान, हरनाथसिंह राजे जसवंतसिंह चौहाऩ दोन्ही मुलांना एकूण ११ अपत्य झाली़ त्यामध्ये प्रतिभा चौहान, कमलराज चौहान, माधवी चौहान, दुर्गा चौहान, युवराज चौहान, ताराबाई चौहान, वीणा चौहान, सुदेश चौहान, निकेश चौहान, क्रांती चौहान, लिना चौहान हे वारसदार आहे़ परंतु यापैकी कुणालाच या जमीन व्यवहारांचा थांगपत्ता लागू दिला नाही़ असा वारसदारांचा आरोप आहे़
शहरात वक्फ बोर्डाच्या जागा, राजे महाराजांच्या जागा, परमपोक जागा, कुळांच्या जागा, इनामी जागा, स्वत: न. प. च्या मालकीच्या जागा, मंदिर, मठ, दर्गा, स्मशानभूमी, कब्रस्तान, तकिया, शासकीय जमिनी, गावठाण जमिनी, गायरान जमिनी, सार्वजनिक विहिरी, तलाव, कुंड, राजांच्या जमिनी, शहरातील रस्ते, अशा कुठल्याच जागांची नोंद नाही़ राजांच्या वारसदारांनी माहूर तहसील कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज करून सर्व्हे क्रं. २/२ व सर्व्हे क्रं. ३ या जमिनीवर राजे जसवंतसिंह यांच्या नावाच्या पुढे सरकारजमा असे लिहिलेले असताना वारसांना विचारणा झाल्याशिवाय खरेदी झाली कशी? असा प्रश्न वारसदारांकडून उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे़
गुप्तधन प्रकरणात १९९३ मध्ये गुन्हा
- शहरात ग्रामीण रुग्णालया- समोरील बाजूस साडेपाच एकर जमीन वर्षानुवर्षे खाली पडून होती़ या जमिनीला लागूनच जुनी श्री जगदंबा हायस्कूल आहे़ याच जागेला लागून भानुतीर्थ कुंड, देवडी, लगतच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत़ वारसदारांकडे असलेल्या पुराव्यावरून या सर्व जमिनी पूर्वजांनी सांभाळण्यासाठी सरकारकडे दिल्या होत्या़ अधिकाऱ्यांनी अनेकांच्या नावे या जमिनी केल्याचा आरोप वारसदारांनी केला आहे़
- लेंडाळ्याचा जुना सर्व्हे क्रं.२/२ असून त्या जागेसाठी सत्तरी पार केलेल्या अन् अंधत्व आलेल्या कृष्णराजसिंह यांच्याकडून त्या जमिनी काही जणांनी आपल्या नावे केल्या आहेत़भानुतीर्थला लागून असलेल्या राजांच्या पडीक असलेल्या जागेतून (महालातून) (देवडीतून) गुप्तधन काढल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात २७ जुलै १९९३ रोजी ९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे़ वारसदार या प्रकरणात नव्याने याचिका दाखल करणार आहेत़
- माहूर हे ऐतिहासिक शहर असून येथे अनेक राजे, महाराजांच्या जमिनी, जुने वाडे आहेत़ त्यामुळे या ठिकाणी गुप्तधनासाठी खोदकाम करण्याच्या अनेक घटना घडतात़ इतर राज्यांतून गुप्तधनाच्या शोधात या ठिकाणी टोळ्या येतात़ विशेष करुन माहूरच्या किल्ल्यात या टोळ्यांनी हैदोस घातला आहे़
- किल्ल्यात आजही अनेक ठिकाणी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे दिसून येते़ त्यात आता राजे महाराजांच्या सरकारकडे असलेल्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ हजारो हेक्टर जागा ही माहूर नगर पंचायतकडे आहेत़ परंतु या जागांच्या नोंदीबाबत मोठा गोंधळ घालण्यात आला आहे़