मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 18:13 IST2021-09-17T18:11:48+5:302021-09-17T18:13:35+5:30

अलीकडच्या काळात इतिहासातील संदर्भाचे वाचन हे ठरावीक जातीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रघात वाढीस लागला आहे.

The struggle for the liberation of Marathwada was not against one caste, but against the deadly tendency towards democracy: Ashok Chavhan | मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता

मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता

नांदेड : मराठवाडा मुक्तीचा लढा हा जात, धर्म, पंथ यांच्यापलीकडे सार्वभौम प्रजासत्ताकासाठी, लोकशाहीची मूल्ये जपली जावीत यासाठी होता. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मराठवाडा मुक्तीचा हा लढा दिला. हा लढा कोण्या एका जातीच्या विरोधात नाही, तर लोकशाहीला मारक असलेल्या प्रवृतीच्या विरोधात होता, मानवी मूल्यासाठी होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या ७३ वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री चव्हाण म्हणाले, ज्या लोकशाही मूल्यांसाठी महात्मा गांधी आग्रही होते, त्याच लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घेऊन स्वामी रामानंद तीर्थ घडले. मराठवाडा मुक्तीचा हा लढा लोकशाही मूल्यांसाठीचा लढा होता. एका बाजूला भारताला स्वातंत्र्य देताना दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांनी हैदराबादसह असंख्य संस्थाने तशीच ठेवून त्यांना मर्जीप्रमाणे कारभाराची मुभा दिली. त्याकडे आपण अभ्यासूवृत्तीने पाहिले पाहिजे. मुळात अखंड भारतात फूट पाडण्याची ती राजनीती होती. अलीकडच्या काळात इतिहासातील संदर्भाचे वाचन हे ठरावीक जातीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रघात वाढीस लागला आहे. नव्या पिढीपासून जर इतिहासाच्या पानातील सत्य दडवून ठेवले तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास मानवंदना व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदी उपस्थित होते.

Web Title: The struggle for the liberation of Marathwada was not against one caste, but against the deadly tendency towards democracy: Ashok Chavhan