विशेष मुलाखत: प्रत्येकाला घर, अन्न मिळालं की फेकून द्या माझ्या कविता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 08:12 IST2026-02-28T08:03:41+5:302026-02-28T08:12:52+5:30
जगातलं सर्वोत्तम साहित्य वाचा, तिथे शेवटच्या माणसाचं दुःख दिसेल. या माणसाचा विचार झाला असता तर ७० वर्षांमध्ये काहीतरी बदललं असतं...

विशेष मुलाखत: प्रत्येकाला घर, अन्न मिळालं की फेकून द्या माझ्या कविता...
विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून नांदेड येथे सुरू होत आहे. यानिमित्त संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत यांच्याशी खास बातचीत.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणती मूल्ये केंद्रस्थानी असावीत असं वाटतं?
- मला जे उघड्या डोळ्यांनी दिसतं, तेच मी लिहितो. साहित्याची कोणती परंपरा, कोणता अभ्यास हे माझ्या डोक्यात नसतं. जगातलं दुःख मला दिसतं, मानवतेला लाजवतील अशा घटना दिसतात, त्या घटना म्हणजे माझ्या कविता. माझ्या कविता म्हणजे माझ्या प्रतिक्रिया आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला दोन वेळचं जेवण मिळालं पाहिजे. बाकी परंपरा-उपपरंपरा मला माहिती नाहीत. माझी शेवटपर्यंत एकच लढाई असेल माणसानं माणसाचा सन्मान करावा. मी फक्त भारतापुरता मर्यादित नाही; जगाचा विचार करून लिहितो. जगातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे, ही माझी कविता आहे, ही माझी भावना आहे. विद्रोह म्हणजे तरी काय करणार आहात तुम्ही? तो आरसाच दाखवणं आहे ना..!
सतत विरोधाचा सूर लावणं कितपत योग्य ?
- विद्रोह म्हणजे विरोधाचा सूर नाही. तो चांगल्या दिवसाचा सूर आहे. माणसाचं आयुष्य 'बेहतरीन' असलं पाहिजे, एवढंच. ही चांगल्या दिवसासाठीची लढाई आहे, कोणाच्या विरोधासाठी नाही. माणूस शांत राहिला पाहिजे. मानवी जीवन एकदाच मिळतं आणि ते नीट जगायला पाहिजे. मला नेहमी प्रश्न पडतो की, गौतम बुद्ध झाले, येशू ख्रिस्त झाले; मग दोन महायुद्धं कशी झाली? शांतीचा संदेश देणारे होते, तरी शहरांवर बॉम्ब टाकले गेले. आजही युद्धं सुरू आहेत, दवाखान्यांवर बॉम्ब टाकले जातात. मग, माणुसकी कुठे आहे? माझ्या कविता माणसाच्या या मूळ प्रवृत्तीवर आहेत.
'आता होऊन जाऊ द्या' या पहिल्या संग्रहातील परिवर्तनाची अपेक्षा पूर्ण झाली का?
- बदल व्हावा ही अपेक्षा होती. माणसाचे चांगले दिवस यावेत म्हणून तो संग्रह होता. पण, बदलाचा वेग खूपच कमी आहे; किंबहुना नाहीच्या बरोबर. १९९० ला संग्रह आला; ३०-३५ वर्षांनीही परिस्थिती फार बदललेली दिसत नाही. कवी म्हणून आपण सावध करतो; ऐकणं न ऐकणं कतीच्या हाती कसं असेल?
'आणि शेवटी काय झाले? 'मधील आत्मटीकेची भूमिका कशामुळे?
- स्वतःलाही कधीतरी आरशात बघायला पाहिजे. पहिल्या संग्रहात व्यवस्थेला म्हटलं 'आता होऊन जाऊ द्या'; पण, स्वतःत बदल केला का? अन्याय फक्त माणसावर नाही, प्राण्यांवरही आहे. बैलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आपण आणि मग आत्महत्या करतो. माझ्या 'बायोस्कोप'मध्ये बैल शेतकऱ्याला विचारतो, 'शोषण माझं केलं आणि मालक तुम्हीच संपलात!' हे सगळं शोषण आहे.
चळवळीतील नेतृत्व सत्तेत बदलल्याचं आपण लिहिलं आहे, ते का?
- माणसाची वृत्तीच तशी आहे. सत्तेत गेलेले लोक लोकांसाठी गेले होते; पण, तिथे जाऊन ते समझौते करतात. पदासाठी लाळ गाळतात. ते व्यवस्थेचाच भाग होतात. कार्यकर्ता नेता झाला की वागणं बदलतं. त्या वेदना कविता पकडते. जग बदलायचं असेल तर सजगपणे जगा. भूक गुन्हेगारी जन्माला घालते... मी पाहिलंय ते. अन्याय कायम असतो; त्याची रूपं बदलतात. कविता त्या बदलत्या रूपांकडे बोट दाखवते.
इतकं स्पष्ट लिहिताना भीती वाटली नाही?
- नाही. माणूस म्हणून कर्तव्य आहे. आपण गुन्हा करत नाही; आरसा दाखवतो. अनेक जण म्हणतात, 'आमची भावना मांडलीत.' कवीची ड्यूटीच आहे ती.
जागतिकीकरणानंतर माणूसपणाचं अवमूल्यन कसं दिसतं?
नागपूरमध्ये म्हातारे लोक रिक्षा चालवतात; कोलकात्यात लोक चप्पल न घालता रिक्षा ओढतात.... कुणाला काही वाटत नाही. प्रत्येक चौकात भिकारी उभे. रिझर्व्ह बँकेसमोर भिकारी अन् तिथेच संविधान चौक, तिथेच भारतातला झिरो मैल आणि बाजूलाच विधानभवन ! लाल लाइट लागतो अन् त्याला पैसे द्यायला जातो तर हिरवा लाइट लागतो. मागचा म्हणतो, 'चलो जल्दी आगे चलो...' आणि पैसे माझ्या खिशातच राहतात. ही स्थिती आहे आजची! माझ्या 'नागपूर' या कवितेत मी हे मांडलंय. मुंबईत एक बाई म्हणाली, 'चौदा दिवस मी सूर्य पाहिलेला नाही.' इतकं प्रगत शहर; पण, सूर्य दिसत नाही तिला! मग, आपण काय केलं? जगातलं सर्वोत्तम साहित्य वाचा, तिथं शेवटच्या माणसाचं दुःख दिसेल. मराठीत ते क्वचित दिसतं. शेवटच्या माणसाचा विचार झाला असता तर ७० वर्षामध्ये काही तरी बदललं असतं ना? शहरांमध्ये रस्ते झाले, मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्या; आतली स्थिती तीच आहे.
आपल्या कवितेचा हेतू काय?
- प्रत्येकाला घर आणि अन्न मिळालं तर माझ्या कविता फेकून द्या... उलटपक्षी मीच फेकेन. उद्देश पूर्ण झाला की कविता नकोच.
मुलाखत व शब्दांकन : दुर्गेश सोनार
सहायक संपादक, 'लोकमत'
durgesh.sonar@lokmat.com