नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:50 IST2025-06-04T17:50:10+5:302025-06-04T17:50:29+5:30

बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत.

Relationships are becoming looser, more than 350 divorces in a year in Nanded district | नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

नांदेड : सहजीवतील पती-पत्नीमधील हरवत चाललेला संवाद अन् मोबाइलच्या अतिरेकी वापर, त्यातून एकमेकांच्या मनात भटकणारे संशयाचे भूत आणि त्यातूनच सातजन्मासाठी बांधलेली गाठ सैल होत आहे. मागील वर्षाभरात नांदेड जिल्ह्यात साडेतीनशेंहून अधिक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले आहेत. कौटुंबिक न्यायालयात मागील पाच महिन्यात पावणेदोनशे प्रकरणे दाखल झाली आहेत.

अहिल्यानगर येथील वैष्णवी हगवणे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे पती-पत्नीतील नातेसंबंध आणि कौटुंबिक हिंसाचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत. नांदेड जिल्हा कौटुंबिक न्यायालयात दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३३१ प्रकरणे दाखल झाली तर १ जानेवारीपासून आजपर्यंत मागील पाच महिन्यात १६४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ही आपापसात समेट घडवून मिटविली जात असली तरी अनेक प्रकरणात वर्षानुवर्षे वाद सुरू असतात. त्यामध्ये मुलं कुणाकडे राहणार, पोटगी यासह विविध मागण्या आणि विषयावर वाद-विवाद सुरू असतात.

किरकोळ कारणावरून वाद
कौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांपैकी ७० ते ८० टक्के दाम्पत्यांचे घटस्फोट मंजूर होतात. त्यातील बहुतांश प्रकरणे ही आपसी तडजोडीच्या घटस्फोटाची आहेत. नोकरीनिमित्त एकमेकांपासून दूर राहणे, पतीपेक्षा पत्नीला अधिक पगार अथवा मोठी नोकरी असणे, स्वाभिमानीवृत्तीचा अतिरेकी आव, काही प्रकरणात तर मोबाइल, सोशल मीडिया व गॅलरी असलेले लॉकदेखील घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर अनेक ठिकाणी लगेच अपत्य नको, एकच अपत्य हवे या विषयावरूनदेखील पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

घटस्फोटाची कारणं-संवादाचा अभाव की स्वाभिमानाची धुसफूस?
या घटस्फोटांमागे अनेक कारणे समोर येतात. पती-पत्नीमधील संवादाचा अभाव, एकमेकांप्रती समजून घेण्याची कमी वृत्ती, मोबाइलच्या अतिरेकामुळे हरवलेली माणुसकीची नाळ, सासू-सासरे यांच्याशी होणारे वाद, एकत्र कुटुंब न आवडणं किंवा करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या नावे एकमेकांना वेळ न देणे आदी कारणे आहेत.

नाते टिकविणे गरजेचे
घटस्फोटाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या सामाजिक रचनेत पती-पत्नी दोघांनाही करिअर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं. यातून संवाद कमी होतो आणि संशय वाढतो. घरगुती हिंसाचाराची केसेसही त्याचबरोबर वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा स्त्रिया सहनशक्तीच्या पलीकडे जाऊनही गप्प बसतात, पण एक दिवस त्यांचा संयम तुटतो आणि तेव्हा या घटनांना वेगळे वळण लागते. कायदा महिलांच्या बाजूने आहे, पण त्याचा वापर सजगतेने आणि गरजेप्रमाणे व्हावा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पती-पत्नीचे पवित्र नाते असून, ते टिकविणे गरजेचे आहे. कोर्टापेक्षा सामोपचाराने कुटुंबातच आपापसातील वाद मिटवून घ्यावेत.
- ॲड. प्रसाद रानवळकर, वकील

म्युच्युअल घटस्फोटाचे प्रमाण अधिक
न्यायालयात गेल्यानंतर लागणारा वेळ आणि समाजात होणारी बदनामी यातून अनेक दाम्पत्य कुटुंबांमध्येच म्युच्युअल घटस्फोट घेत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारदेखील होत आहेत. परंतु, भविष्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने झालेले घटस्फोट दोघांसाठीही अडचणीचे ठरू शकतात.

Web Title: Relationships are becoming looser, more than 350 divorces in a year in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.