Nanded: गावातील बोअरवेल बंद, गोदावरीतील खड्ड्याने घेतला मायलेक अन् पुतणीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:52 IST2025-06-07T17:50:52+5:302025-06-07T17:52:43+5:30
उमरी तालुक्यातील भायेगावातील हृदयद्रावक घटना; कपडे धुण्यासाठी गोडवरीत गेलेल्या माय,लेक आणि पुतणीचा बुडून एकाच वेळी मृत्यू

Nanded: गावातील बोअरवेल बंद, गोदावरीतील खड्ड्याने घेतला मायलेक अन् पुतणीचा जीव
उमरी (जि. नांदेड): "आई, वाचव ना!" अशा आर्त हाकेसरशी महानंदा हणमंते यांनी नदीत उडी घेतली. नदीतील खड्डा खोल असल्याने मायलेकी दोघी बुडू लागल्या हे पाहून पुतणीने लगेच बचावासाठी धाव घेतली. मात्र, गोदावरीतील खोल खड्ड्याने अखेर माय-लेक आणि पुतणी अशा तिघींचेही प्राण गिळले. महानंदा भगवान हणमंते (३५), पायल भगवान हणमंते (१३) आणि ऐश्वर्या मालू हणमंते (१३) अशी मरण पावलेल्या मायलेकींची आणि पुतणीची नावे आहेत. उमरी तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही अत्यंत हृदयविदारक घटना घडली.
गावातील बोअरवेलची विद्युत मोटार आठ दिवसांपासून बंद असल्यामुळे कपडे धुण्यासाठी महानंदा यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर जाण्याचे ठरवले. मुलगी पायल आणि पुतणी ऐश्वर्या या दोघींना घेऊन महानंदा किनाऱ्यावर आल्या. महानंदा कपडे धुण्यात व्यस्त असताना पाण्यात खेळत असलेल्या पायलचा पाय घसरला अन् ती खोल पाण्यात ओढली गेली. तिच्या मदतीच्या आर्त हाकेने आई महानंदाने वाचविण्यासाठी झेप घेतली, पण दोघीही गटांगळ्या खात बुडाल्या. हे पाहून पुतणी ऐश्वर्याने दोघींना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले अन् तीही त्या खोल पाण्यात बुडाली. हे भयंकर दृश्य घटनास्थळी असलेल्या एका महिलेने पाहिले आणि मदतीसाठी तिने मोठ्याने आवाज दिले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या तिघींचे मृतदेह गावकरी आणि पोलिसांनी नावेच्या सहाय्याने शोधून बाहेर काढले.
गावाजवळच बळेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठा पाणीसाठा असतो. याच साठ्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. उमरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उमरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ह्या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.