Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती
By श्रीनिवास भोसले | Updated: June 20, 2025 17:44 IST2025-06-20T17:44:24+5:302025-06-20T17:44:39+5:30
स्वबळावर लढण्याच्या शर्यतीत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची ‘गोची’!

Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती
नांदेड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांत कार्यकर्त्यांची चढाओढ आणि तिकिटासाठीची फिल्डिंग, आपणच कसे दावेदार हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही काही कार्यकर्ते पक्षांतर्गत स्पर्धक पाहून दुसरा झेंडा घेण्याच्याही तयारीत आहेत. दरम्यान, सर्वच पक्षाचे नेते स्वतंत्र लढण्याची भाषा करत असून त्यातून इच्छुकांची मात्र गोची होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोमात सुरू झाली असून जिल्हा परिषद, महानगरपालिका, प्रभाग व गट- गणरचनेच्या प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत आता ६३ ऐवजी ६५ गट झाले असून गणांची संख्या १३० असेल. त्यामुळे नव्याने निर्माण होणाऱ्या गटाकडेही लक्ष लागले आहे. गट रचनेमध्ये स्थानिक आमदारांना हाताशी धरून काही इच्छुक आपल्याला फायदेशीर असलेली गावे आपल्या गटात कशी राहतील, यासाठीही फिल्डिंग लावत आहेत. दरम्यान, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत ‘स्वबळावर’ लढण्याच्या घोषणा सुरू असल्या तरी प्रत्यक्ष निवडणूक तोंडावर आल्यावर ‘महायुती’ किंवा ‘महाविकास आघाडी’सारख्या गठबंधनाचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. असे झाल्यास त्या त्या पक्षाकडून तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबविण्याचे आव्हान नेत्यांपुढे असेल. त्यातून बंडखोरी वाढू शकते. त्याचा धोका एकूणच निकालावर होऊ शकतो, त्यामुळे सर्वच नेते स्वतंत्र लढून पुन्हा एकत्र सत्ता स्थापन करू, असा विचार व्यक्त करत आहेत. त्याचा फटका नेत्यांसाठी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत हातात हात घालून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना बसेल.
आजघडीला नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. त्याचबरोबर अनेकजण आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात मनगटावर घड्याळ बांधून घेत आहेत. तर काहींनी आमदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. राज्यात विरोधी बाकड्यावर असलेले महाविकास आघाडीमध्ये मात्र सध्या शांतता पहायला मिळत आहे. काँग्रेसकडे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या तरुण नेतृत्व असताना अद्यापपर्यंत जिल्हाध्यक्ष पदावर एकमत झालेले नाही. त्यातच काँग्रेसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्याचे अन् त्यांना संधी मिळवून देण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे आहे. अशा परिस्थितीत भाजपने नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच प्रभाग, वार्डात ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये असलेले अनेक माजी नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कमळ हाती घेण्याच्या तयारीत लागले आहेत.
स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न
आपणच आपापल्या भागात सर्वोत्तम पर्याय आहोत हे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम, शक्तिप्रदर्शन व सोशल मीडियावरून प्रचार केला जात आहे. तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाण्याचा अप्रत्यक्ष इशाराही अनेक इच्छुकांकडून दिला जात आहे. ही परिस्थिती महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) अशा सर्वच पक्षांत दिसून येत आहे. त्यात काँग्रेस सह विरोधी पक्षांना 'लोटस ऑपरेशन'चीही धास्ती आहे. आगामी निवडणुकांमध्ये लोटस ऑपरेशनचा फायदा घेण्याच्या तयारीत भाजप आहे. स्वतंत्र निवडणुका लढल्यास त्याचा फटका घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बसू शकतो.
अशोकरावांमुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले...
सत्ताधारी पक्षांकडे कार्यकर्त्यांचा कल झुकताना दिसत असून नवीन राजकीय पर्यायाच्या शोधात अनेकजण आहेत. त्याच अनुषंगाने ‘फिल्डिंग’ही जोरात सुरू आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे भाजपकडे आकर्षण वाढले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका स्वतंत्र लढून नांदेड हा काँग्रेसचा नव्हे तर अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्याचे आव्हान चव्हाणांपुढे असणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांना अधिक महत्त्व येणार आहे.
‘मॅनेजमेंट गुरू’मुळे भाजपचा जोर
नांदेड भाजपला सध्या माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासारखा 'मॅनेजमेंट गुरू' लाभला आहे. कार्यक्रमाचे अचूक नियोजन, बूथस्तरावरील रणनीती आणि निवडणूक तयारी यासाठी त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये त्यांनी ‘कार्यक्रम निमित्ताने प्रचार’ करत भाजपच्या निवडणूक तयारीस गती दिली आहे. त्यांच्या नियोजनशक्तीची दखल विरोधकांकडूनही घेतली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.