१५०० लोकांच्या गावात १५ हजार जन्मनोंद घोटाळा; नांदेड पोलीसांनी झारखंडहून ५ जणांना उचललं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:26 IST2026-02-16T13:24:12+5:302026-02-16T13:26:41+5:30
सावळेश्वर जन्म नोंद घोटाळा: नांदेड पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई; रांचीतून एका महिलेसह पाच जणांना अटक

१५०० लोकांच्या गावात १५ हजार जन्मनोंद घोटाळा; नांदेड पोलीसांनी झारखंडहून ५ जणांना उचललं!
बारुळ (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सावळेश्वर (ता. कंधार) बनावट जन्म नोंदणी प्रकरणाचा उलगडा करण्यात उस्माननगर पोलिसांना मोठे यश आले आहे. या रॅकेटचे मुख्य धागेदोरे झारखंडमध्ये असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी रांची येथून चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
१५०० च्या गावात १५ हजार जन्म!
२०११ च्या जनगणनेनुसार सावळेश्वर गावाची लोकसंख्या अवघी १५०० आहे. मात्र, २०२५ मध्ये 'सीआरएस' प्रणालीचा गैरवापर करून चक्क १५ हजार ५७० बनावट जन्म नोंदी करण्यात आल्याचे उघड झाले. हा आकडा लोकसंख्येच्या तुलनेत दहा पटीने जास्त असल्याने खळबळ उडाली होती. या नोंदींमध्ये प्रामुख्याने झारखंड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश असल्याचे संशय आहे.
रांचीमध्ये १० दिवस पोलिसांचा 'डेरा'
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तपास यंत्रणा वेगाने हलली. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रांचीमध्ये १० दिवस मुक्काम ठोकून आरोपींचा मागोवा घेतला. या तांत्रिक तपासाअंती पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना आता नांदेडमध्ये आणण्यात आले आहे.
आंतरराज्य रॅकेटचा संशय
केवळ नांदेडच नाही, तर यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशाच प्रकारच्या संशयास्पद नोंदी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे रॅकेट राज्यभर पसरले आहे का? आणि यामागे नेमका कोणता मोठा उद्देश आहे? याचा तपास आता सुरू झाला आहे. या कारवाईमुळे बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.