श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:20 IST2026-02-05T19:19:05+5:302026-02-05T19:20:10+5:30
यावेळी हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांनी "आम्हाला फक्त न्याय हवा" अशी आर्त साद घातली.

श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): दाभड येथील ७५ वर्षीय पार्वतीबाई सूर्यवंशी यांची आठ दिवसांपूर्वी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र, आठवडा उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी बुधवारी पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांनी "आम्हाला फक्त न्याय हवा" अशी आर्त साद घातली.
तपासासाठी 'एसआयटी'ची मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी यावेळी गंगाधर सूर्यवंशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हत्येचे कारण आणि मारेकरी यांचा शोध लागत नसल्याने त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. या प्रकरणाच्या तपासासाठी 'विशेष तपास पथक' (SIT) तयार करण्याच्या आणि तपासाला वेग देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. "ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," असे आ. चव्हाण यावेळी म्हणाल्या. याच दौऱ्यात आ. चव्हाण यांनी गावात अपघातात निधन झालेल्या कलावतीबाई सुभाषराव तारडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, बालाजी गव्हाणे, राजेश्वर शेट्टे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
काय आहे नेमकी घटना?
दि. २८ जानेवारी रोजी पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी या नेहमीप्रमाणे शेतात निघाल्या होत्या. त्या रात्री घरी न परतल्याने शोध घेतला असता, शिवारातील एका विहिरीजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह सापडला. अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची क्रूर हत्या केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असला, तरी मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.