पिठलं-भाकरी आणि दादांची माणुसकी.. कधीही न विसरता येणारी आठवण: आ. राजेश पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:01 IST2026-01-29T18:00:01+5:302026-01-29T18:01:22+5:30
Ajit Pawar Death: ज्यांना साध्या जेवणातही आपुलकी दिसायची, तो रोखठोक नेता अचानक विमान अपघातात आपल्यातून निघून जावा, ही घटना धक्का देणारी आहे.

पिठलं-भाकरी आणि दादांची माणुसकी.. कधीही न विसरता येणारी आठवण: आ. राजेश पवार
नांदेड: परळीहून नांदेडमार्गे मुंबईकडे जाणारा तो प्रवास आज आठवला अन् डोळ्यात पाणी आले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकाच विमानाने मुंबईकडे जाणार होते. धावपळीच्या त्याक्षणी नांदेड विमानतळावर नेऊन दिलेला पिठलं-भाकरीचा डबा... एक आठवण बनून गेल्याची भावना आमदार राजेश पवार यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला घरून डबा आणायला सांगितल्याने मी सर्वांसाठी पिठलं, भाकरी अन् ठेचा, कांदा, शेंगदाणा चटणी असा डबा घेऊन गेलाे होतो. त्यावेळी अजितदादांना बोललो की, ‘दादा, यात अस्सल मराठवाड्याचं पिठलं-भाकरी आहे.’ हे शब्द ऐकताच अजितदादांचा चेहरा खुलला अन् ते म्हणाले, अरे व्वा! माझ्या आवडीचं जेवण आणलंस, ते शब्द आणि आवाज आजही कानात घुमतो. अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी मनाला चटका लावणारी आहे.
ज्यांना साध्या जेवणातही आपुलकी दिसायची, तो रोखठोक नेता अचानक विमान अपघातात आपल्यातून निघून जावा, ही घटना धक्का देणारी आहे. विधानसभेत प्रत्येक आमदाराला नावानिशी ओळखणारा, अधिवेशनाच्या गडबडीतही काय राजेशजी, कसे आहात? अशी आस्थेने चौकशी करणारा नेता आज आपल्यात नाही, याची हानी शब्दांत मांडता येत नाही.
स्पष्ट मत मांडणं, थेट बोलणं आणि तरीही माणसं जपणं हा त्यांचा मूळ स्वभाव कधीच बदलला नाही. त्यांच्याच या स्वभावाचं अनुकरण करत, प्रेरणा घेत मीदेखील स्पष्ट आणि परखडपणे आपली भूमिका मांडत असतो. पण अशी माणुसकी, आपुलकी आणि अशी नेतृत्वाची उंची पुन्हा मिळेल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. हिंद दी चादर कार्यक्रमात झालेला नमस्कार शेवटचा असेल असे कधीच वाटले नाही, असे आमदार राजेश पवार यांनी सांगितले.