अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:38 IST2026-01-28T11:37:50+5:302026-01-28T11:38:35+5:30
Ajit Pawar Death: नांदेडमध्ये गुरुचरणी नतमस्तक झाले अन् साऱ्यांचा निरोप घेतला; अजितदादांच्या जाण्याने चिखलीकरांना अश्रू अनावर

अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट
नांदेड: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पोलादी व्यक्तिमत्त्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांचे लाडके 'दादा' अजित पवार यांच्या निधनाची वार्ता धडकताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी नांदेडचा दौरा केला होता, कोणालाही वाटले नव्हते की ही त्यांची नांदेडशी झालेली शेवटची भेट ठरेल. या बातमीने आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
२५ जानेवारीची ती भेट आणि शेवटचं दर्शन
अवघ्या ७२ तासांपूर्वी, २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान येथे आयोजित 'हिंद दी चादर' अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर अजितदादांनी सर्वात आधी सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन माथा टेकला होता आणि दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य सोहळ्यात हजेरी लावून उपस्थितांशी संवाद साधला होता. तोच संवाद आता शेवटचा ठरला आहे.
नांदेडशी होते जिव्हाळ्याचे नाते
विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेसाठी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. मागील काही काळात त्यांनी तब्बल सहा वेळा जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा हा नेता अचानक असा निघून जाईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. प्रतापराव चिखलीकर आणि अजितदादांचे असलेले जवळचे संबंध पाहता, चिखलीकर यांनी या दु:खाच्या प्रसंगी आपला संयम गमावला असून नांदेडमधील जनजीवन या बातमीने पूर्णपणे सुन्न झाले आहे.