भिवंडीच्या तरुणांनी युवतीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:13 AM2020-12-02T04:13:11+5:302020-12-02T04:13:11+5:30
नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतिनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा ...
नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतिनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
आसिफ अन्सारी आणि मस्तान अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मूळचे भिवंडी, मुंबईचे रहिवासी आहेत. दोन वर्षापासून ते नागपुरात शिवशक्तीनगरात राहत होते. प्लम्बिंगचे काम करणाऱ्या आसिफ आणि मस्तानची रूम जेथे होती तेथे बेपत्ता मुलीचे नातेवाईक राहायचे. त्यामुळे तिचे तेथे जाणे-येणे होते. यातून आरोपींची तिच्यासोबत ओळख झाली. या पार्श्वभूमीवर, बाजारात जाते, असे सांगून सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर पडली. आरोपी आसिफ आणि मस्तान तिला भेटले. ५ वाजेपर्यंत ते इकडेतिकडे फिरत होते. त्यानंतर तवेरा गाडीतून ते नागपुरातून निघून गेले. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी शोधाशोध केली. रात्री १० वाजता ते यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहायक पोलीस उपनिरीक्षक मुस्ताक शेख यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या रूमची तपासणी केली. यावेळी मिळालेल्या माहितीतून ते भिवंडीकडे पळून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांचे एक पथक आरोपींना शोधण्यासाठी लवकरच भिवंडीकडे रवाना होणार आहे.
---