नागपुरात कामगारांचा महा-आक्रोश ! मुख्यमंत्री सचिवालयावर धडकला विराट मोर्चा; 'या' प्रमुख मागण्यांसाठी एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:14 IST2026-04-08T18:10:13+5:302026-04-08T18:14:25+5:30
Nagpur : आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि नोकरीच्या सुरक्षेसाठी आज नागपुरात कामगारांचा प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला.

Workers' anger in Nagpur! A huge march hit the Chief Minister's Secretariat; Elgar for 'these' major demands
नागपूर: आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि नोकरीच्या सुरक्षेसाठी आज नागपुरात कामगारांचा प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला. भारतीय मजदूर संघाशी (BMS) संलग्न असलेल्या विदर्भ प्रदेशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येत आज नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून भव्य 'श्रमिक आक्रोश मोर्चा' काढला. हा जनसागर पाहून नागपूरचे प्रशासन आणि सत्ताकेंद्र हादरून गेले आहे.
विविध संघटनांची एकजूट
या महामोर्चामध्ये केवळ वीज कामगारच नाही, तर रेल्वे, ऑटो कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार आणि खासगी कंपन्यांचे मिल मजूरही खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियमपासून सुरू झालेला हा मोर्चा घोषणाबाजीने दणाणून गेला होता.
काय आहेत कामगारांच्या प्रमुख मागण्या?
- महाराष्ट्र वीज कामगार संघ आणि इतर संघटनांनी सरकारसमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
- नोकरीची सुरक्षा: सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरक्षेची कायदेशीर आणि ठोस हमी मिळावी.
- हरियाणा पॅटर्न: महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी हरियाणा राज्याचा पॅटर्न लागू करावा.
- समान काम, समान वेतन: एकाच स्वरूपाच्या कामासाठी सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्याची अंमलबजावणी व्हावी.
- ५ दिवसांचा आठवडा: विद्युत मंडळातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कार्यकाळ निश्चित करावा.
आंदोलकांचा तीव्र इशारा
हा मोर्चा थेट मुख्यमंत्री सचिवालयावर धडकला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनजीतसिंह राठोड आणि आंदोलक अभिजित माहुलकर यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. "जर सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल," असा सज्जड इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही कामगारांनी दिला आहे