रेल्वेस्थानक, विमानतळावर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर कधी होणार ?
By योगेश पांडे | Updated: December 17, 2024 16:58 IST2024-12-17T16:56:52+5:302024-12-17T16:58:08+5:30
Nagpur : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला सवाल

When will Aurangabad's railway station and airport be named Chhatrapati Sambhajinagar?
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहराचे केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाच्या वतीने नामांतरण करण्यात आले आहे. मात्र तेथील विमानतळ, रेल्वेस्थानकांसह बऱ्याच आस्थापनांचा नामोल्लेख औरंगाबाद असाच आहे. त्यांचे नामांतरण कधी होणार असा सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
विशेष उल्लेखाच्या माध्यमातून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक संस्थावर सुद्धा छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख झालेला नाही. धाराशिव व अहिल्यानगरचे सुद्धा नुकतेच नामांतरण झाले आहे. येथील स्थानिक संस्थांवरही नव्या नावाचा नामोल्लेख करण्यात यावा,अशीही मागणी दानवे यांनी केली. उत्तर प्रदेशातील फैझाबादचे एका रात्रीत आयोध्या असे नामांतरण झाले. मात्र राज्यात संभाजीनगर, धाराशिव व अहिल्यानगर यांचे नामांतर होऊन मोठा कालावधी गेला आहे. तरीही अद्यापपर्यंत येथील स्थानिक संस्थांवर नवीन नावाप्रमाणे उल्लेख का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.