विदर्भाने रचला इतिहास ! पहिल्यांदाच पटकावला विजय हजारे करंडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:09 IST2026-01-19T13:02:34+5:302026-01-19T13:09:49+5:30
Nagpur : अथर्व तायडेच्या शानदार शतकापाठोपाठ यश ठाकूर आणि नचिकेत भुते यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रविवारी इतिहास रचला.

Vidarbha creates history! Wins Vijay Hazare Trophy for the first time
नागपूर : अथर्व तायडेच्या शानदार शतकापाठोपाठ यश ठाकूर आणि नचिकेत भुते यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रविवारी इतिहास रचला. अंतिम सामन्यात बलाढ्य सौराष्ट्रचा ३८ धावांनी पराभव करत विदर्भाने पहिल्यांदाच प्रतिष्ठित विजय हजारे करंडक (एकदिवसीय स्पर्धा) आपल्या नावावर केला.
बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर रंगलेल्या या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३१७धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा डाव ४८.५ षटकांत २७९ धावांत संपुष्टात आला.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर विदर्भाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अथर्व तायडेने ११८ चेंडूंत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या आतषबाजीसह १२८ धावांची खेळी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेला अमन मोखाडे (३३ धावा) बाद झाल्यानंतर, अथर्वने यश राठोडसोबत डावाची सूत्रे हाती घेतली. यश राठोडने ६१ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत विदर्भाला भक्कम स्थितीत आणले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचे फलंदाज विदर्भाच्या गोलंदाजीसमोर अडखळले. प्रेरक मंकडने ९२ चेंडूंत १० चौकारांसह ८८ धावांची खेळी करत झुंज दिली. विदर्भाकडून यश ठाकूरने सर्वाधिक ४ बळी टिपले. नचिकेत भुतेने ३ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.