हा 'अवकाळी' पाऊस मातीसाठी घातक ! सर्वाधिक फटका शेतीक्षेत्र आणि अन्नसुरक्षेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:07 IST2026-04-06T14:05:40+5:302026-04-06T14:07:56+5:30
Nagpur : शेतातील मातीचे आरोग्य सुदृढ ठेवून ते जपण्यासाठी मातीला उन्हाळ्यात विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, अवकाळी पावसामुळे या विश्रांतीत अडसर निर्माण होतो.

This 'unseasonal' rain is dangerous for the soil! The biggest hit will be on the agricultural sector and food security.
नागपूर : शेतातील मातीचे आरोग्य सुदृढ ठेवून ते जपण्यासाठी मातीला उन्हाळ्यात विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, अवकाळी पावसामुळे या विश्रांतीत अडसर निर्माण होतो. पिकांची मुळे सडण्यासह पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढणे, उत्पादन घटणे व इतर काही घातक परिणाम पुढील काही वर्षे त्या शेतात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकावर दिसून येतात. खरं तर, अवकाळी पाऊस, गारपीट हा बदलत्या हवामान व वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम आहे. या बदलांचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्र आणि अन्नसुरक्षेला बसत असला तरी कोणीच गांभीर्याने घेत नाही.
मातीला विश्रांती का द्यावी?
मातीचे आरोग्य व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मातीला मार्च ते मे या काळात किमान ६० ते ७५ दिवसांची विश्रांती देणे अत्यावश्यक असते. माती नांगरणी अथवा वखरणी करून उघडी करणे व ती प्रखर उन्हात ४० ते ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवणे आवश्यक असते. त्यामुळे सॉइल सोलरायझेशन, वायू विनिमय व अन्नद्रव्यांचे संवर्धन होते.
निचरा न होण्याचे परिणाम
या शत्रू बुरशी व जीवाणूंमुळे जमिनीचा पोत बदलून चिकणमातीचे प्रमाण वाढते व मातीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते. माती कडक होत असून, सेंद्रिय कर्ब कमी होते व क्षारांचे प्रमाण वाढते. पाणी साचल्याने ऑक्सिजन बाहेर फेकला जातो व जमीन अनारोबिक स्थितीत जाते. ऑक्सिजनच्या अभावामुळे मातीत विषारी वायू तयार होतात.
अवकाळी पावसाचा परिणाम
अवकाळी पावसामुळे माती ओली होत असल्याने तिला पुरेशी विश्रांती मिळत नाही. ओलाव्यामुळे मातीत फ्यूसेरियम, पिथियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा या पिकांसाठी घातक ठरणाऱ्या बुरशी तसेच राल्स्टोनिया सोलेनेसिएरम, अँथोमोनास, रूट नॉट निमॅटोड यासह इतर जीवाणू तयार त्यांचा झपाट्याने प्रसार होतो. मातीत पाण्याचा निचरा होण्याची प्रक्रिया मंदावते.
पिकांवरील परिणाम
फ्युसेरियममुळे पिकांवर मर अर्थात मुळकुजचा प्रादुर्भाव होऊन मुळे कुजतात. ही बुरशी मुळांवाटे झाडांमध्ये शिरत असल्याने झाडांची पाणी शोषून घेण्याची क्षमता नष्ट होत असल्याने ती अकाली वाळतात. पिथियममुळे रोपे सडतात तर रायझोक्टोनियामुळे अन्नद्रव्य शोषण थांबत असल्याने मुळे व खोड सडते. फायटोप्थोरामुळे झाडे डिक्याला बळी पडतात तर राल्स्टोनिया सोलेनेसिएरमुळे मर, झंथोमोनासमुळे कॅन्कर, रूट नॉट निमॅटोडमुळे पाने पिवळी पडणे व वाढ खुंटणे आदी समस्या उद्भवतात.