सरसंघचालकांचा दावा, काही विरोधक व कम्युनिस्टदेखील संघ चांगला असे म्हणतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:28 IST2026-03-19T15:23:53+5:302026-03-19T15:28:38+5:30
Nagpur : संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही.

Sarsanghchalak claims that even some opponents and communists say that the Sangh is good
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही. काळासोबत संघाचे कार्य वाढले आहे. आता विरोधक व काही कम्युनिस्ट बोलताना संघाचे आम्ही विरोधक आहोत असे म्हणतात. मात्र संघ चांगला आहे असेही ते म्हणतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केला. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
अनुकूलता हे एक मोठे आव्हानच असते व पतनाची सुरुवात अनुकूलतेतूनच होते. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी अनुरूप झाला असे नाही. तो होऊ नये याचे प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत. अनुकूलतेत कसे काम करावे हा विषय बौद्धिक वर्गात असतो. स्वयंसेवकांना अनुकुलतेची बाधा होऊ नये यावर विचार सुरू असतो व तसे प्रयत्न दिसून येतात, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
रचनेचे विकेंद्रीकरण, मात्र संघाच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल नाही
शंभर वर्षांच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे. लोकांशी मैत्री करायची व आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती आहे. रूप काळानुरूप बदलत असले तरी कार्यपद्धती तीच आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
वक्तव्यांचा विपर्यास, अनेक गोष्टी शिकायला मिळतात
अनेकदा वक्तव्यांचा विपर्यास होतो. मात्र त्याचे मला फारसे काही वाटत नाही. उलट मला दया येते व हसू येते. संघाविरोधात बोलायला आता लोकांकडे फारसे काही नाही. मात्र काही तरी बोलायला हवे म्हणून असे प्रकार करतात. अशा घटनांतून आपलेदेखील शिक्षण होते. विशेष म्हणजे काय बोललल्यावर लोक काय अर्थ काढू शकतात हे समजते, असे प.पू.सरसंघचालक म्हणाले.
संघाच्या कार्याबाबत ‘जेन-झी’ अनुकूल
‘जेन-झी’ असे संबोधित करण्यात येत असलेल्या पिढीमध्ये देशाला मोठे करायचे आहे व आपली परंपरा आणखी समोर न्यायची आहे असा विचार दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता व सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून ते संघकार्याबाबत अनुकूल आहेत. प्रत्यक्ष शाखेत येण्यास परिस्थितीनुरूप काही अडचणी असल्या तरी ते संघकार्यात जुळू इच्छितात. त्या पद्धतीची व्यवस्थादेखील संघाकडून करण्यात येत आहे. हायराईज इमारती, सोसायटींमध्ये तरुणांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी सरसंघचालकांनी दिली.