संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:01 IST2025-05-31T12:59:08+5:302025-05-31T13:01:10+5:30
Nagpur : गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात

Sangh, mother and student council shaped me: Nitin Gadkari's feelings at book launch
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोक आधी भारतावर विश्वास ठेवत नव्हते. परंतु, अलीकडच्या काही घडामोडींमधून क्षमता सिद्ध झाल्यामुळे लोक भारतावर विश्वास ठेवायला लागले आहेत. परिणामी, जगाचाही भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत अशक्य ते शक्य करू शकतो, हे सर्वांना कळून चुकले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या 'संघातील मानवी व्यवस्थापन' या पुस्तकाचे शुक्रवारी आंबेकर आणि ज्येष्ठ संपादक व विचारवंत विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेपेठेतील वनामती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये चारित्र्याला खूप महत्व आहे. देशामध्ये आधी शुद्ध चारित्र्याचे लोक होते. त्यामुळे हा देश हजारो वर्षापर्यंत एकसंघ राहू शकला. म्हणूनच संघ चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य करतो. असे व्यक्तीच देशाला सर्वश्रेष्ठ बनवू शकतात. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांमुळे परिवारच एकत्र राहू शकत नाही, देश व संघटना तर दूरची गोष्ट आहे, असेही आंबेकर यावेळी म्हणाले.
घळसासी यांनी वर्तमान राजकीय नेत्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता दिसून येत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. आज बहुतेक नेत्यांना संगीत, साहित्य व नाट्यामध्ये रुची नाही. ते वाचन करीत नाहीत. वैचारिक चर्चा करीत नाहीत. त्यामुळे अनेकांची अभिव्यक्ती उथळ व बटबटीत वाटते. असे नेते देशाची जडणघडण करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राजहंस प्रकाशनचे संचालक नरेश सबजीवाले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर, आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.
राष्ट्र सर्वोतोपरी, ते समृद्ध व्हावे
माझ्याकरिता राष्ट्रच सर्वोतोपरी असून, ते समृद्ध व्हावे, हीच माझी नेहमी इच्छा असते, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. माझे जीवन आई, संघ आणि विद्यार्थी परिषदेमुळे घडले. कार्य, कर्तृत्व, जीद्द, चिकाटी, संवेदनशीलता, सहृदयता, समभाव आदी गुण या तिघांमुळेच मिळाले. त्यातून मी देशहिताकरिता उल्लेखनीय कामे करू शकलो. देश व समाजाकरिता काम करण्याची इच्छा असली की काहीच अशक्य राहत नाही. जगात जे काही चांगले आहे, ते सर्व भारतात आले पाहिजे आणि सर्वजन सुखी झाले पाहिजे, असे मला नेहमी वाटते, असे गडकरी यांनी सांगितले. विचारशून्यता ही आज देशाची मोठी समस्या आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.