साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष,मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 11, 2024 18:04 IST2024-03-11T18:02:05+5:302024-03-11T18:04:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती.

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष,मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार
राकेश घनघोडे, नागपूर : दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा (५३) याच्यासह इतर पाच कथित नक्षलवाद्यांची निर्दोष सुटका करणाऱ्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ५ मार्च रोजी संबंधित निर्णय दिला. त्याविरुद्ध अपील करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय भूषण गवई व संदीप मेहता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम दर्शनी उच्च न्यायालयाचा निर्णय गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगून या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. परंतु, या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी सरकारला अनुमती देण्यात आली.
इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२९), हेम केशवदत्ता मिश्रा (३८), प्रशांत राही नारायण सांगलीकर (६०), विजय नान तिरकी (३६) व पांडू पोरा नरोटे (२८) यांचा समावेश आहे. नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे निधन झाले आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही देहरादून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी या आरोपींना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेचे सदस्य असणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य इत्यादी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली होती. तसेच, सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला होता. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर झाले. या आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई करताना बंधनकारक तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. आरोपींविरुद्ध खटला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुऱ्या कायदेशीर नाहीत, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.