पावसाच्या पाण्याच्या अडथळ्याचा कायमस्वरूपी निचरा; नागपूर विभागाची शाश्वत अभियांत्रिकी यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:56 IST2025-06-23T20:55:41+5:302025-06-23T20:56:16+5:30
पावसाळ्यापूर्वीच मार्ग सुगम व सुरक्षित करण्यात आला आहे.

पावसाच्या पाण्याच्या अडथळ्याचा कायमस्वरूपी निचरा; नागपूर विभागाची शाश्वत अभियांत्रिकी यशोगाथा
नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने एलसी गेट क्रमांक 41 जवळील लिमिटेड हाइट सबवे (एलएचएस) मध्ये दीर्घकाळ चालू असलेली जलजमावाची समस्या कायमस्वरूपी सोडवून स्थानिक ग्रामस्थांना व वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. 27 मे 2025 रोजी हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वीच मार्ग सुगम व सुरक्षित करण्यात आला आहे.
सदर एलएचएस 2015 मध्ये एलसी गेट बंद केल्यानंतर सुरू करण्यात आले होते. मात्र नैसर्गिक निचऱ्याच्या अभावामुळे येथे पावसात नेहमीच पाणी साचून वाहतूक खोळंबत असे. दरवर्षी डिझेल पंपच्या सहाय्याने पाणी काढले जात होते, तरीही समस्या कायम होती. 2023 मध्ये नागपूर विभागाच्या अभियंत्यांनी 165 मीटर अंतरावर खाजगी शेतजमिनीमधून वाहणाऱ्या नाल्याचे निरीक्षण केले, ज्याचा खालचा स्तर एलएचएसच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे ‘ट्रेंचलेस पाइप पुसिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 600 मिमी आरसीसी पाइपलाइन टाकण्यात आली, ज्यामुळे शेतजमिनीचे नुकसान टाळले गेले. या पाइपलाइनमध्ये निरीक्षण कक्ष देखील बसविण्यात आले आहेत.
या शाश्वत उपायामुळे आता वारंवार पाणी काढण्याची गरज भासणार नाही. पावसाळ्यातही मार्ग खुला राहील, ज्याचा फायदा शाळेची वाहने, आपत्कालीन सेवा व सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या प्रकल्पाद्वारे नागपूर विभागाने लोककल्याण, दीर्घकालीन नियोजन आणि शाश्वत अभियांत्रिकी यामध्ये आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.