लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाज्या आणि डाळींच्या किमती आकाशाला भिडल्यानंतर आता कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. ठोक बाजारात आवक कमी असल्याने किरकोळमध्ये कांदे ६० रुपये किलो विकल्या जात आहेत. महागाईत कांद्याचा तडका महाग झाला आहे.यंदा मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह अन्य राज्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक कमी असून जास्त भावात विक्री होत आहे. पांढरे कांदे फार कमी प्रमाणात येत आहेत. कळमन्यात ४० किलो (मण) कांद्याची किंमत १४०० ते १६०० रुपयांवर गेली आहे. त्यात दररोजच्या आवकीप्रमाणे भाववाढ होत आहे. सध्या ठोकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव ४० रुपये आहेत.भाववाढीमुळे आणि विक्री कमी असल्याने व्यापारी व अडतिया कांदे विक्रीसाठी बोलविण्यात नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कनार्टक आणि आंध्र प्रदेशात लाल कांदे पावसामुळे खराब झाले आहे. त्यामुळे आंधप्रदेशाच्या बाजारात दररोज होणारी ४०० ट्रकची आवक सध्या १०० ट्रकवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याशिवाय अकोला, बुलढाणा, नाशिक, पुणे या भागात कांद्याचे पीक खराब झाले आहे. निर्यात बंद झाल्यानंतरही स्थानिक बाजारात आवक वाढण्याऐवजी माल कमी प्रमाणात येत आहेत. त्याचाचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.या मोसमातील कांद्याचा साठा करता येत नाही. याशिवाय डाग असलेले कांदे लवकरच खराब होत असल्याने विक्रीअभावी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागते. मध्यप्रदेशातून विक्रीसाठी येणारे कांदे येणे बंद झाले आहे. बाजारात कांदे महाग झाल्यामुळे ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. सध्या रेस्टॉरंटमध्ये पार्सल सेवा सुरू असून ५ ऑक्टोबरपासून हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय बटाट्यांचीही आवक कमी असल्याने भाववाढ झाली आहे. बटाटेही ५० ते ६० रुपये किलो विक्री होत आहे.