बापरे ! दर वर्षी इतके सारे घटस्फोट ? घटस्फोटाची कारणे काय?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 16, 2025 12:52 IST2025-06-16T12:51:40+5:302025-06-16T12:52:03+5:30

Nagpur : घटस्फोटाची संख्या का वाढत आहे?

Oh my God! So many divorces every year? What are the reasons for divorce? | बापरे ! दर वर्षी इतके सारे घटस्फोट ? घटस्फोटाची कारणे काय?

Oh my God! So many divorces every year? What are the reasons for divorce?

नागपूर : वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटाच्या तेराशेवर याचिका दरवर्षी मंजूर होत आहेत. २०२१ ते २०२४ या चार वर्षांमध्ये नागपूर कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाच्या ५ हजार ५६९ याचिका निकाली काढल्या. त्यापैकी ५ हजार ४४४ याचिका मंजूर करून याचिकाकर्त्या पती-पत्नीला घटस्फोटासाठी पात्र ठरविण्यात आले. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तब्बल १ हजार ८८१ दाम्पत्यांना घटस्फोट देण्यात आले.
 

वर्ष - घटस्फोट मंजूर - नामंजूर
२०२१ - १२३४ - १३

२०२२ - १३९२ - ३८
२०२३ - १४३२ - ३५

२०२४ - १३८६ - ३९
 

घटस्फोटाची कारणे काय?
आजच्या काळात सर्वाधिक घटस्फोट आपसी सहमतीने घेतले जातात. तसेच, अनैतिक संबंध व क्रूरतापूर्ण वागणूक या दोन कारणांमुळे होणाऱ्या घटस्फोटांची संख्या मोठी आहे. हिंदू विवाह कायद्यातील कलम १३ अनुसार, अनैतिक संबंध, क्रूरतापूर्ण वागणूक, सलग दोन वर्षांवर काळापासून विभक्त राहत असणे, धर्मांतरण करणे, गंभीर मानसिक आजार, संसर्गजन्य लैंगिक आजार, एखाद्या धार्मिक संप्रदायाची दीक्षा घेऊन प्रपंचाचा त्याग करणे, सात वर्षांवर काळापासून जिवंत असल्याचे ऐकिवात नसणे इत्यादी कारणांमुळे घटस्फोट घेता येतो. तसेच, कलम १३-ब मध्ये आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याची तरतूद आहे.

घटस्फोटाची संख्या वाढत आहे

वर्तमान काळातील अनेक पती-पत्नी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय जीवन जगायचे असते. त्यांना तडजोड करायची नसते. अशावेळी वाद विकोपाला गेल्यास ते लगेच वेगळे होण्याला प्राधान्य देतात. परिणामी, घटस्फोटाची मागणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालये वाद झालेल्या दाम्पत्यांचे संसार वाचविण्यासाठी मध्यस्थी, समुपदेशन इत्यादी आवश्यक उपाय करतात. परंतु, बरेचदा समेट घडून येत नाही.

काय म्हणतात विधिज्ञ?
अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीला विविध कारणांमुळे एकमेकांसोबत राहणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे त्यांना घटस्फोट मागावाच लागतो. सुखी भविष्याकरिता यापेक्षा दुसरा योग्य मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध नसतो. असे घटस्फोट टाळले जाऊ शकत नाही. परंतु, काही प्रकरणांमध्ये क्षुल्लक कारणांवरूनही घटस्फोट मागितले जातात. ही बाब भारतीय विवाह संस्थेकरिता धोकादायक आहे. वाद झालेल्या दाम्पत्याने तडजोड करणे शक्य असल्यास कुटुंबाच्या भविष्याकरिता माघार घेणे आवश्यक आहे.

ॲड. सौरभ राऊत, कुटुंब न्यायालय, नागपूर.

Web Title: Oh my God! So many divorces every year? What are the reasons for divorce?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.