लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महावितरण, टोरंट पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटीनंतर आता टाटा पॉवरनेही वीज वितरणात उडी घेतली आहे. टाटा पॉवरने छत्रपती संभाजीनगर, जालना, बदनापूर, वाळूज या भागांत समांतर वीज वितरणासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे.
सध्या महावितरण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात वीज वितरणाचे काम पाहते. परंतु, टाटा पॉवरच्या या पावलानंतर मराठवाड्यासारख्या भागात देखील खासगी वीज वितरण कंपन्यांची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवरने मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. आयोग सूचना व हरकतींचा विचार करून पुढील टप्प्यात जनसुनावणी घेणार आहे. याआधी आयोगाने टोरंट पॉवर व अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांच्या नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई या भागांतील अर्जाना प्राधान्य देत २२ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. टाटा पॉवरने मागणी केलेल्या परवान्यात छत्रपती संभाजीनगर महापालिका, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, ऑरिक एमआयडीसी, जालना महापालिका क्षेत्र, बदनापूर नगर पंचायत, जालना एमआयडीसी, अतिरिक्त जालना एमआयडीसी, तसेच जालना सीड पार्क एमआयडीसी या १० भागांचा समावेश केला आहे.
पाच वर्षांत ३९ हजार ग्राहकांना सेवा देणारटाटा पॉवरच्या मते त्यांना वीज वितरणाचा परवाना मिळाल्यास पुढील पाच वर्षांत ते ३९ हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा देतील. औद्योगिक व नागरी क्षेत्रांना दर्जेदार व सतत वीज पुरवठा करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेमुळे मराठवाडा विभागात वीज वितरणात स्पर्धा निर्माण होणार असून, याचा लाभ थेट ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. आता महावितरणसमोर खासगी क्षेत्रातील स्पर्धक उभे राहत असल्याने दर, सेवा आणि गुणवत्तेवर परिणाम होणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.